पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एमएमआरडीएतर्फे आता पश्चिम द्रुतगती महामार्गामध्ये बदलण्यात येणार आहे. या मार्गावरील पुलांच्या खाली काही ठिकाणी सिग्नल आहेत. त्यामुळं प्रवासादरम्यान वाहनचालकांना नियमांचं पालन करावं लागतं. परिणामी, प्रवासासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळं प्रवाशांची प्रवास जलद व्हावा यासाठी हा मार्ग सिग्नलविरहित करण्यात येणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे ते बोरीवली दरम्यानचा २५ किमीचा पट्टा शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
वांद्रे ते बोरीवली अशा ४ लेनची वाहतूक अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी या मार्गावर विविध कामं करण्यात येणार आहेत. या कामांसाठी अंदाजित शंभर कोटी रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएनं जागतिक पातळीवरील सल्लागाराची नेमणूक केली आहे. सल्लागार लवकरच सविस्तर प्रकल्प अहवालही एमएमआरडीएला सादर करणार आहे.
या मार्गावर वाहन चालकांसाठी सुस्पष्ट साइन बोर्ड, जंक्शन डिझाइन, उड्डाणपुलावर सहजपणे प्रवेश आणि बाहेर पडता येण्यासाठी मार्गिका, लेन मार्किंग अशा बाबींची आवश्यकता आहे. येथील चारही लेनची मार्गिका सुधारण्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे एमएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यता आलं आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि उत्तम कशी होईल, वाहतूककोंडी कशी टाळता येईल याबाबतही अभ्यास करण्यात येणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग ११ लाख चौरस मीटर क्षेत्रावर असून ५.८ लाख चौरस मीटर भागासाठी निविदा काढण्यात आली आहे. तसंच, ४.८ लाख चौरस मीटर क्षेत्रावर होणाऱ्या कामाच्या निविदा एका आठवड्यात काढण्यात येणार आहे.
वाद्र्यातील खेरवाडी जंक्शनवर असलेल्या नाल्याचं परीक्षण एमएमआरडीए करणार आहे. त्याचप्रमाणं या नाल्याची ड्रेनेज क्षमता वाढवण्यात येणार आहे. येथील पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आलं आहे. या अनुषंगानं काही दुरुस्तीची कामं पूर्ण करण्यात येणार आहेत. तसंच, या कामाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. ही कामं ६ महिन्यांत पूर्ण करण्याचा एमएमआरडीए प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा -
रेल्वे स्थानकातील 'इतक्या' फेरीवाल्यांवर कारवाई
परदेशी नागरिकांना अंमली पदार्थ पुरविल्याप्रकरणी टुरिस्ट गाइडला अटक