मुंबईसहीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढण्यास सुरूवात झाली आहे. अनेक लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचं तसंच मास्क घालत नसल्याचंही आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा आणखी धोका वाढला आहे.
मास्क न घालणाऱ्यांवर आता पश्चिम रेल्वेने कारवाईचा धडाका लावला आहे. रेल्वेकडून विना मास्क प्रवास करणाऱ्यांना दंड आकारला जात आहे. पश्चिम रेल्वेने १ ते ६ मार्च या कालावधीत एकूण ८ लाख ८३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेसह एकत्र कारवाई करून फेब्रुवारीमध्ये ५ लाख ९७ हजार रुपयांचा दंड मास्क न घालून प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केला होता.
पश्चिम रेल्वेने १ ते ६ मार्च या दरम्यान ३८१९ लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर २६ फेब्रुवारी रोजी एकाच दिवसांत सर्वाधिक ४३० जणांवर कारवाई करण्यात आली. यातून ७५ हजार २०० रुपये दंड जमा झाला.
कोरोनाकाळात रेल्वेला जवळपास १७ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत रेल्वेला भाड्यातून मिळणाऱ्या महसुलात ८२८३ कोटींची घट आली आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे रेल्वेने सर्व ट्रेन सेवा रद्द केल्या होत्या. १२ मेनंतर श्रमिक स्पेशल ट्रेन आणि काही इतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या.