मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेच्या वतीनं झाडांच्या फांद्यांची योग्यप्रकारे छाटणी केल्यानंतरही ही झाडं पडू लागली आहेत. वरवर चांगली आणि मजबूत दिसणारी झाडं क्षणार्धात कोसळत आहेत. त्यामुळे या पडणाऱ्या झाडांना जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. पेव्हरब्लॉकच्या वाढत्या प्रस्थामुळंच झाडांच्या मुळांची वाढ खुंटत असून चांगली दिसणारी झाडं उन्मळून पडत असल्याचं बोललं जात आहे.
दहिसर पूर्व येथील दुबे मार्गावरील दुघर्टना असो वा दादर पश्चिम येथील मारुती रोडवरील सीकेपी हॉलसमोरील झाड पडण्याची दुघर्टना असाे वा भांडूपमधील बदामाच्या झाडाची फांदी कोसळून झालेली दुघर्टना. या तिन्ही घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर सहा ते सात जण जखमी झालेले असून त्यातील एकाला गंभीर दुखापत झालेली आहे. अाता या दुघर्टनेनंतर झाड कोसळण्याच्या मुळाशी जाण्याची वेळ आली आहे.
दादरमधील जे गुलमोहराचं झाड कोसळलं, त्याच्या बुंध्याला अगदी पेव्हरब्लॉकनं विळखा घातला होता. असंच दहिसर आणि भांडूपधील झाडांच्या बाबतीत आहे. ही सर्व झाडं दिसायला उत्तम व मजबूत होती. परंतु ही झाडं मजबूत दिसत असली तरी पेव्हरब्लॉक, त्याखालील सिमेंट, तसंच त्याझाडाखाली उंदरांनी केलेली घरं हीच याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचं उद्यान विद्याविषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
झाडं ही मातीतच चांगली रुजली जातात आणि त्यांची पाळमुळं खोलवर पसरली जातात. या खोलवर पसरलेल्या मुळांमुळेच झाडांचा भार संभाळला जातो. उंचउंच पसरलेल्या झाडांचा तोल हा जमिनीत लांबपर्यंत पसरलेल्या मुळांद्वारे सांभाळला जातो. परंतु सिमेंटीकरण आणि पेव्हरब्लॉकमुळे झाडांची मुळं खोलवर रुतत नाहीत तसंच आजुबाजुला पसरत नाहीत. परिणामी अनेकदा झाडांच्या फांद्या छाटूनही त्यांचा समतोल राखता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा चांगलं, मजबूत दिसणारं झाडंही अचानक पडलं जातं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मुंबईतील ही सर्व झाडं वाचवायची असतील तर झाडांच्या भोवती असलेले पेव्हरब्लॉक व सिमेंटीकरण रोखलं पाहिजे. एवढंच नाहीतर या झाडांच्या मुळात उंदीर, घुशींचा वावर होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. आज मुंबईतील सर्व झाडं अशाचप्रकारची असून जर सर्व झाडांचा सर्व्हे झाला तर मुंबईतील निम्मी झाडं कापावी लागतील, अशीही भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेच्या वतीनं झाडांची काळजी घेतली जात असली तर अनेकदा विकासक आपल्या इमारतीच्या दरवाजात असलेली झाडं कशाप्रकारे पडून मार्गातील अडसर दूर होईल, याचाच विचार करत असतो. हा त्याचाही भाग असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ही झाडं जी पडत आहेत, त्याला जेवढी महापालिका जबाबदार आहे, तेवढी पेव्हरब्लॉक बनवण्याची मागणी करणारे रहिवाशी, त्या भागातील विकासक, लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हेही वाचा -
पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडल्यास जेलची वारी
मुंबईकरांनो, याद राखा! २३ जूनपासून प्लास्टिक पिशवी वापराल तर...