भारतीय क्रिकेटचं नियंत्रण करणाऱ्या बीसीसीआयला केंद्रीय माहिती आयोगानं माहिती आधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगाने आदेश दिल्यानंतर बीसीसीआयने त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे, तर या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत बीसीसीआय असल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी क्रिकेट प्रशासकीय समितीच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचाही आरोप बीसीसीआयकडून केला जात आहे.
केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयामुळे, बीसीसीआयच्या स्वायत्ततेला सुरुंग लागणार असून बीसीसीआय राष्ट्रीय क्रीडा संघटना म्हणून ओळखली जाणार आहे. याप्रकरणी बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या प्रशासकांनी या प्रकरणात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा दाखविला असून भारतीय क्रिकेट बोर्डाची बाजू मांडण्यात ते कमी पडल्याची बीसीसीआयची भावना आहे.
तसंच, लोकांना माहितीच्या अधिकाराखाली प्रश्न विचाराता यावेत, यासाठी येत्या १५ दिवसांत माहिती आयोगानं बीसीसीआयला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता यावेत, अशी व्यवस्था करण्याचा आदेश दिला आहे.
केंद्रीय माहिती आयोगाने बीसीसीआयला यासंदर्भात नोटीस पाठवली. परंतू विनोद राय यांच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने या नोटीसकडे वारंवार दुर्लक्ष केलं. तसंच, माहिती आयोगाने सुनावलेला निर्णय हा काही ठराविक प्रकरणांवर आहे. त्यामुळं बीसीसीआयचे वकील या निर्णयाचा अभ्यास करत असून त्यानंतरच योग्य ते पाऊल उचललं जाणार असल्याची माहिती बीसीसीायच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा-
राजकोट कसोटीतून पृथ्वी करणार टेस्टमध्ये पदार्पण
अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड