मुंबईचा वंडरबाॅय पृथ्वी शाॅ वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेतून भारतातर्फे पदार्पण करणार आहे. पृथ्वी के. एल. राहुलसोबत सलामीला येईल असं जवळपास निश्चित झालं आहे. गुरूवार ४ आॅक्टोबरपासून राजकोट इथं भारत वेस्ट इंडिजसोबत पहिला कसोटी सामना खेळणार आहे. दुलीप आणि रणजी पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी पहिल्यावहिल्या कसोटीत शतक झळकावेल का? याची उत्सुकता जाणकारांना लागली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ने या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली. या १२ खेळाडूंच्या संघात अपेक्षेनुसार १८ वर्षीय पृथ्वी शाॅ याला स्थान मिळालं. कर्नाटकचा फलंदाज मयांक अग्रवाल याची या संघात निवड न झाल्याने त्याला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर इंग्लंडविरोधात बऱ्यापैकी कामगिरी करणाऱ्या हनुमा विहारी याची देखील निवड करण्यात आलेली नाही. पृथ्वी भारतातर्फे खेळणारा २९३ वा कसोटी खेळाडू असणार आहे.
📢 Just in: India announce 12-man squad for the first Test against West Indies. #INDvWI pic.twitter.com/BlESa0B4z7
— cricketnext (@cricketnext) October 3, 2018
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या पृथ्वीने निवड समितीसोबतच क्रिकेट जगतातील जाणकारांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. पृथ्वीने १४ प्रथम श्रेणी सामन्यात ५६.७२ च्या सरासरीने १,४१८ धावा केल्या आहेत. त्यात ७ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. तर अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये देखील त्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं.
पृथ्वी शॉ, के. एल. राहुल, विराट कोहली (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, ऋषभ पंत, आर. आश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकूर.
खेळाडूंच्या निवडीनुसार भारत ५ गोलंदाजांसोबत खेळण्याची शक्यता आहे. संघात आर. आश्विन, रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या रुपात ३ फिरकी गोलंदाज, तर मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे जलदगती गोलंदाज असू शकतील.
हेही वाचा-
मुंबईकर पृथ्वी शाॅ वेस्ट इंडिजविरोधात पदार्पणास सज्ज!
अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड