इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील काही सामने पावसात वाहून जात असल्याने क्रिकेट चाहते नाराज होत आहेत. या नाराजीवर मिश्कील भाष्य करताना बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी वर्ल्डकप भारतात आणि आम्हाला पावसाची खूप गरज आहे, असं ट्विट केलं आहे.
इंग्लंडमध्ये सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप (ICC CWC 2019) सुरू आहे. त्यामुळे देशभरातील क्रिकेट चाहते टीव्ही स्क्रीनला चिकटून बसले आहेत. भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश मानला जातो. त्यामुळे केवळ भारताचीच नाही, तर इतर देशांची मॅच सुरू असेल, तेव्हाही हे चाहते टीव्हीकडे नजरा खिळवून बसत आहेत. परंतु इंग्लंडमध्ये अधूनमधून पाऊस पडत असल्याने या चाहत्यांची निराशा होत आहे.
shift the tournament WC 2019 to India .. we need the rain .. !!! 🤣🤣🤣 https://t.co/KcGAAEODyr
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 13, 2019
या स्पर्धेत आतापर्यंत ४ मॅच पावसाने रद्द झाल्या असून आठवड्याभरात ३ मॅच रद्द झाल्या आहेत. यामध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड या मॅचचा देखील समावेश आहे. मॅच रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आले आहेत. या १-१ गुणामुळे न्यूझीलंड ४ सामन्यांत ७ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर भारतीय संघ ३ सामन्यांत ५ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. भारताची पुढची मॅच १६ जूनला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. परंतु या मॅचवरही पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनातली धाकधुक वाढली आहे.
हीच बाब हेरुन अमिताभ बच्चन यांनी दुष्काळाने हैराण झालेल्या भारताला पाण्याची गरज असल्याने वर्ल्डकप भारतात आणा म्हणजे त्याच्यासोबत पाऊसही येईल, अशी मिश्कील टिप्पणी केली आहे.
हेही वाचा-
शिखर धवन दुखापतग्रस्त, ३ आठवड्यांसाठी संघाबाहेर