पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारणारा दादर यूनियन संघ आणि यजमान प्रबोधनला हरविणारा पय्याडे क्रिकेट क्लब यांच्यात प्रबोधन मुंबई टी-२० स्पर्धेची अंतिम झुंज रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत दादर यूनियनने गतविजेत्या कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनवर ४४ धावांनी विजय मिळविला तर पय्याडेने प्रबोधन संघावर १३ धावांनी विजय साकारला.
प्रथम फलंदाजी करताना दिनेश साळुंखेने हार्दिक तामोरेसह ८० धावांची झंझावाती भागीदारी रचली. साळुंखेने २९ चेंडूंत ६६ धावांचे योगदान दिले. त्यानंतर करण मोरे अाणि यशस्वी जैस्वाल यांनीही १०६ धावांची भागीदारी रचल्याने दादर यूनियनला २० षटकांत ७ बाद २७३ धावा करता अाल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकला ब्रविश शेट्टी (६१) आणि आकर्षित गोमेल (५८) यांनी शतकी सलामी दिली. मात्र ही जोडी तंबूत परतल्यानंतर त्यांचे अन्य फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले आणि त्यांचा डाव केव १७ षटकात २२७ धावात आटोपला.
जय बिश्ता (४४), हर्ष टंक (३३) आणि गौरव जठार (२९) यांच्या उपयुक्त योगदानामुळे पय्याडेने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०२ धावांचे लक्ष्य उभारले. हे उद्दिष्ट गाठताना प्रबोधनने शशांक सिंग (८४ धावा) आणि कौस्तुभ पवार (४८) यांच्या ११५ धावांच्या भागीदारीमुळे २ बाद १५१ अशी दमदार मजल मारली होती. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना धावांचा वेग राखण्यात अपयश आले. प्रबोधनचे ३८ धावांत आणखी ५ फलंदाज तंबूत परतल्याने त्यांना अखेर विजयासाठी १३ धावा कमी पडल्या.
हेही वाचा -