भारताचे महान कसोटीपटू दिलीप सरदेसाई यांना आज जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगल डुडलनं मानवंदना दिली आहे. दिलीप सरदेसाई यांची आज ७८वी जयंती आहे. ८ ऑगस्ट १९४० रोजी गोव्यात जन्मलेले आणि भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे गोव्याचे एकमेव खेळाडू अशी दिलीप सरदेसाई यांची ख्याती आहे. सरदेसाई यांची कारकीर्द अल्प असली तरी त्यांच्या कारकीर्दीत भारतीय संघानं परदेशात विजयाचा तिरंगा डौलानं फडकावण्यास सुरुवात केली होती. त्याकाळच्या बलाढ्य वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी मिळवून दिलेला विजय सुवर्णअक्षरानं कोरला गेला आहे.
सरदेसाई यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात १९५९-६० मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीकडून केली होती. आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर त्यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले झाले. त्यांनी ३३ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यात ५५ डावांत त्यांनी ३९.२३च्या सरासरीने २००१ धावा केल्या. त्यांनी पाच शतके आणि ९ अर्धशतकेही ठोकली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिलीप सरदेसाई यांनी १७९ सामन्यांत १०२३० धावा जमवल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर २५ शतकं आणि ५६ अर्धशतकांची नोंद आहे.
दिलीप सरदेसाई यांच्या नावावर कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होता. १९७०-७१ साली भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्यांनी ६४२ धावा कुटल्या होत्या. १९७२ मध्ये ते दिल्ली इथं आपला शेवटचा कसोटी सामना खेळले होते. ११ वर्षांपूर्वी म्हणजेच २ जुलै २००७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी दिलीप सरदेसाई यांची प्राणज्योत मालवली होती.
हेही वाचा -