भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीअाय) डोमेस्टिक स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल केल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) अडचणीत सापडलं अाहे. १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्राॅफी स्पर्धा एरव्ही नोव्हेंबरमध्ये सुरू व्हायची. पण ही स्पर्धा अाता अाॅक्टोबरच्या पहिल्या अाठवड्यात खेळवली जाणार अाहे. मुंबईत सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती असते. अशा परिस्थितीत विविध वयोगटातील संघांची निवड कशी करायची, अशा पेचात एमसीए सापडलं अाहे. त्यामुळे स्पर्धांचे वेळापत्रक बदलण्यासाठी एमसीएनं बीसीसीअायला लेखी पत्र पाठवून विनंती केली अाहे.
देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत पाऊस असतो. अशा परिस्थितीत विविध वयोगटाच्या स्पर्धा अायोजित करणे किंवा प्रशिक्षण शिबिर भरवणे कठीण असल्यामुळे एमसीएनं हे पाऊल उचललं अाहे. होतकरू खेळाडूंची कामगिरी न पाहताच त्यांची निवड कशी करायची. अाम्ही सराव सामने किंवा स्पर्धाही अायोजित करू शकत नाहीत. त्यामुळे अाम्हाला संघ निवडीसाठी वेळ हवा अाहे, अशी मागणी एमसीएचे सहसचिव डाॅ. उन्मेष खानविलकर यांनी केली अाहे.
बीसीसीअायच्या नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा ३ अाॅक्टोबर ते १४ डिसेंबरपर्यंत रंगणार अाहे. संपूर्ण देशात या स्पर्धेतील ९७ सामने खेळवले जाणार असून बऱ्याच राज्य संघटनांनी अापल्या ज्युनियर संघासाठी कोणतेही सराव शिबिर अायोजित केले नाही. म्हणूनच बीसीसीअाय याप्रकरणी लक्ष घालून सर्वांसाठी योग्य तोडगा काढेल, अशी अाशा खानविलकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
मुंबईच्या अाणखी एका प्रशिक्षकाचा राजीनामा
'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'
क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले
सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, करणार कोचिंग!