कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे रहिवाशांसाठी जीवघेणे ठरू लागले आहेत. मागच्या दीड महिन्यांमध्ये खड्ड्यांमुळे ३ जाणांचा बळी गेला आहे. तरीही अजून स्थानिक प्रशासनाच्या डोळ्यांवर झापड कायम आहे.
बुधवारी हाजी मलंग रोडवर अण्णा नावाचे (पूर्ण नाव कळू शकलेलं नाही) इसम चालत असताना खड्ड्यात पाय जाऊन रस्त्यावर पडले. त्याच वेळेस पाठिमागून ट्रक येत असल्याने या ट्रकखाली येऊन अण्णा यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा मृतदेह रूक्मीणीबाई रुग्णालयात पाठवला. हाजी मलंग रोडवर जागोजागी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे इथं नेहमीच अपघात हाेतात. परंतु आता यामुळे रहिवाशांचा जीवही जाऊ लागल्याने स्थानिक भयभीत झाले आहेत.
अशाच खड्ड्यांमुळे २ जून रोजी कल्याणमधील शिवाजी चौक परिसरात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर ७ जुलै रोजी याच ठिकाणी खड्ड्यामुळे बाईक घसरून झालेल्या अपघातात ४० वर्षांच्या महिलेला आपला जीव गमवावा लागला होता.
काँक्रिटच्या रस्त्याच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसवण्यात आल्याने रस्ते वरखाली झाले आहेत. यामुळे पेव्हर ब्लाॅकच्या रस्त्यांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण-मलंग रोड हा १०० फुटांचा रस्ता महापालिकेने बांधला असला तरी द्वारली गावाजवळून जाणारा १ किमीचा रस्ता करण्यास गावकऱ्यांनी हरकत घेतली आहे. जोपर्यंत रस्ता रूंदीकरणाची नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नसल्याची गावकऱ्यांची भूमिका असल्याने या रस्त्याचं काम रखडलं आहे. परिणामी हा रस्ता वाहन चालकाच्या जीवावर बेतत आहे.
हेही वाचा-
डोंबिवलीतील नाल्यात पडलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला
जुहू चौपाटीवर बुडालेल्या तरुणांचे मृतदेह सापडले