धुलिवंदनाच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालवू नका, असं आवाहन आणि जनजागृती पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यानंतरही मद्यप्राशन करून गाड्या चालवणाऱ्या ७७५ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली. त्याच बरोबर विना हेल्मेट, भरधाव वेगानं वाहन चालवणं, ट्रिपल सिट, अशा ३ हजार ८२७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहीता लागू झाली आहे. त्यातच मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी या सणाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीची पावले उचलली होती. शहरात जागोजागी नाकाबंदी करत विशेष बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता. तसंच आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने पोलिसांनी संपूर्ण शहरावर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
होळीच्या सणावेळी बुधवारी सायंकाळपासून पोलिसांनी कारवाईस सुरूवात केली. दारुच्या नशेत गाड्या चालविणाऱ्या मद्यपी चालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह मोहिमेतंर्गत गुरूवारी रात्री १२ वाजेपर्यंत ७२५ जणांवर कारवाई करण्यात आली. तसंच भरधाव वेगानं वाहन चालविल्याप्रकरणी १६६ , ट्रिपल सीट वाहन चालविल्याप्रकरणी ७८९, विना हॅल्मेट वाहन चालविल्याप्रकरणी ४ हजार ७३८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर इतर वाहतूक नियमांंचेे उल्लंघन करणाऱ्या ३ हजार ८२७ जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
हेही वाचा -
धुलिवंदनाच्या दिवशी मुंबईत २ ठिकाणी हत्या
माझगावमध्ये दगडानं ठेचून वृद्धाची हत्या