मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरूण अविनाश शेटे याच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करून त्याला न्याय मिळवून देण्यात येईल, असं म्हणत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शेटे याला दिला आहे.
अविनाशने २०१३ साली सहायक कृषी अधिकारी पदासाठी परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल लागला मात्र त्यात त्याला समाधानकारक गुण न मिळाल्याने आपल्याला डावलण्यात आल्याची भावना त्याच्यात निर्माण झाली होती. त्यामुळे आपल्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन व्हावं, यासाठी तो मंत्रालयात वारंवार फेऱ्या मारत होता.
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास मंत्रालयात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी त्याला आपल्या दालनात बोलावून घेतलं आणि त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी अविनाशसोबत त्याचे वडील देखील उपस्थित होते.
अविनाशची कैफियत ऐकून घेतल्यानंतर कृषिमंत्र्यांनी कृषी आयुक्तालयाला दूरध्वनीवरून सूचना करत या प्रकरणाची फाईल सोमवारी मंत्रालयात घेऊन येण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच सुशिक्षित व्यक्तीने अशी पाऊलं उचलू नये, असं आवाहन करीत अविनाशला त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
मात्र या प्रकरणानंतर मंत्रालयात किंवा परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सामान्यांचा आवाज ऐकला जाणार नाही का? अशा चर्चाना उधाण येत आहे.
हेही वाचा-
मंत्रालयाबाहेर तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न