धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात विषप्राशन करून आपले जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी या घटनेची पुनरावृत्ती मंत्रालय परिसरात घडली आहे.
अविनाश शेटे (२८) असं या तरुणाचं नाव असून तो अहमदनगरचा राहणारा आहे. अविनाशनं कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं कोणताच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश वारंवार मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत होता. पण यातून काहीच निष्पन्न न झाल्याने अखेर अविनाशनं टोकाची भूमिका घेत मंत्रालयाच्या गार्डन गेटवर बुधवारी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांनी वेळीच त्याला रोखले आणि अनर्थ टळला. पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतलं असून यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकली नाही.
राज्यातील शेतकरी आपल्या समस्या स्थानिक सरकारी यंत्रणेकडे मांडत असतानाही त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याने हताश शेतकरी आता आपल्या व्यथा थेट मंत्रालयात मांडताना दिसत आहे. मंत्रालय परिसात आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर मोठा ताण पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक पीडितांनी न्यायासाठी गृह विभागाकडे निवेदन देवून थेट आत्महत्येचा इशारा दिला असल्याचं समजतं.