मुंबई - शीना बोरा हत्येप्रकरणी गरजेपेक्षा जास्त लक्ष घातल्याचं कारण देत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी झाली होती. पण त्यामागचं नेमकं कारण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलंय.
शीना बोराचं प्रकरण गाजत असतानाच राकेश मारिया आणि पीटर मुखर्जी यांची मैत्री असल्याची चर्चा होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी तेव्हा मारियांकडून ब्रीफिंग घेतलं होतं, तेव्हा मारियांनी या केसमध्ये मुखर्जीचा हात नसल्याचं ठामपणे सांगितलं होतं.
मारिया यांनी या केसमध्ये जातीनं लक्ष घातलं होतं आणि त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. त्यानंतर मारियांना प्रमोशनच्या नावाखाली थेट होम गार्ड्सच्या महासंचालकपदी बसवण्यात आलं. तेव्हापासून मारिया तिथेच आहेत. शीना बोरा हत्याप्रकरणाची संवेदनशीलता पाहून हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. मग जे मुंबई पोलिसांना जमलं नव्हतं, ते सीबीआयनं करून दाखवलं. त्यांनी पीटर मुखर्जीला आरोपी तर बनवलंच पण त्याचाही कटात कसा सहभाग होता, याचा लेखा-जोखाही कोर्टासमोर मांडला. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी सीबीआयनं मारियांसह आणखी दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचीही कसून चौकशी केलीये.