कोणत्या ना कोणत्या कारणांवरून कायम चर्चेत असलेले मुंबई पोलिस दलातील झोन ३ चे पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार एका चुकीच्या कारवाईमुळे अडचणीत आले आहेत. नागपाडा येथील गेस्ट हाऊसवर नियमांना धरून कारवाई न करत त्रास दिल्याप्रकरणी गेस्ट हाऊसच्या मालकाने अभिनाश कुमार यांना उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या ‘मोरल पोलिसिंग’वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागलं आहे.
नागपाडाच्या कामाठीपुरा येथील गार्डन गेस्ट हाऊसवर अभिनाश कुमार यांनी २ जानेवारी रोजी पहाटे ३ च्या सुमारास कारवाई केली. गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती कुमार यांना मिळाली होती. या कारवाईत गेस्ट हाऊसमध्ये पाच कपल आढळून आले. त्यातील दोन कपल विवाहित होते. तर इतर तीन प्रेमीयुगल जोड्या होत्या. या सर्वांची गेस्ट हाऊसमधील नोंदणी तसंच पुरावा म्हणून प्रेमी युगलांनी दिलेलं आधारकार्डही कुमार यांंना दाखवण्यात आलं. मात्र तरीही कुमार यांनी त्या तीन प्रेमी युगल जोड्यांना रात्रीच्या वेळेस पोलिस ठाण्यात नेलं.
तसंच गेस्ट हाऊसच्या मालकांनाही रात्री बोलावून घेतलं. मात्र, तपासात गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याचं आढळून आलं नाही. तरीही खात्रीसाठी कुमार यांंनी गेस्ट हाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर तपासण्यासाठी काढून आणला होता. तसंच काऊन्टरवरचे रजिस्टरही आणले होते.
गेस्ट हाऊसचे मालक चंद्रावर्धन पांचोली यांनी या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालत नसल्याचं म्हटलं आहे. गेस्ट हाऊसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा नियमानुसार वास्तव्याचा पुरावा घेऊनच त्यांना गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची परवानगी दिली जाते. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. त्यामुळे कोण कशासाठी येते याबाबत कस्टमरकडे चौकशी केली जात नसल्याचं पांचोली यांनी चौकशीत सांगितलं. मात्र त्यानंतरही पोलिसांनी संबंधीत प्रेमीयुगलांवर दबाव टाकत, पहाटे आणलेल्या प्रेमीयुगलांना सायंकाळी सात वाजता सोडले.
नियमानुसार कुठल्याही महिलेला रात्रीच्या वेळेस बोलावले किंवा आणले जात नाही. पोलिसांनी केलेली कारवाई ही नियमांना धरून नसूूून कायद्याच्या नावाखाली पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप पांचोली यांनी केला आहे. पोलिस कायद्याच्या नावाखाली 'मोरल पोलिसिंग' करत असल्याचा आरोप पांचोलींनी उच्च न्यायालयात अभिनाश कुमार यांच्या कारवाईविरोधात याचिका दाखल केली आहे.
या आधीही मार्वे येथे समुद्र चौपाटीवर बसलेेल्या प्रेमी युगलांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. तर मुंबईत रहात असलेल्यांना शहरात गेस्ट हाऊसमधील खोल्या देण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर मोरल पोलिसिंगचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्तांनी या कारवाया थांबवल्या होत्या.
हेही वाचा -
धुलिवंदनाच्या दिवशी टवाळखोरी कराल, तर तुरूंगात जाल!
लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मनसेचं स्पष्टीकरण