निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना-भाजप, काँग्रेस या पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची नावे देखील जाहीर केली. अशातच, लोकसभा निवडणुकीबाबत मनसे कधी आपली भूमिका मांडणार आहे. तसंच, यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लढणार का? याकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांचही लक्ष लागलं होतं. अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'आगामी लोकसभा निवडणूक ही मनसे लढवणार नाही’ असं स्पष्ट केलं आहे. पक्षाचे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची "लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९" लढविणार नाही, बाकी १९ मार्च २०१९ ला बोलूच... जय महाराष्ट्र!#LokSabhaElections2019 pic.twitter.com/tq8La2y4qt
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) 17 March 2019
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिकृतरित्या पत्रक काढत आगामी लोकसभा निवडणूक मनसे लढणार नसल्याचे सांगितलं आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र, आता १९ मार्च रोजी कार्यकर्ता मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीबाबत काय बोलतील याकडे सर्वांचचं लक्ष लागून राहिलंं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु, राज ठाकरे यांनी आचारसंहिता लागल्यानंतरच निवडणुकांबाबत मनसेची भूमिका स्पष्ट करु असं स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा -
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन