पोषण आहार म्हणून दुपारी देण्यात आलेली खिचडी खाल्ल्यामुळे जोगेश्वरीच्या सर्वोदयनगर येथील पालिकेच्या बाल विकास शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. सुरुवातीला २२ मुलांना विषबाधा झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने जोगेश्वरी येथील कोकण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या २२ मुलांची प्रकृती स्थिर असून संध्याकाळपर्यंत या मुलांना पालक घरी नेऊ शकतात, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. पण आता विषबाधा झालेल्या मुलांच्या संख्येत वाढ होऊन ३५ वर गेली आहे.
जोगेश्वरीच्या सर्वोदयनगर येथील पालिकेच्या बाल विकास या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत रोज दुपारी खिचडी दिली जाते. नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी विद्यार्थ्यांना ही खिचडी देण्यात आली. ती खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्यानं त्या विद्यार्थ्यांना उपचारांसाठी कोकण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसही रुग्णालयात पोहोचले.
विषबाधेची माहिती मिळाल्याबरोबर अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)चं पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. या प्रकरणाची चौकशी हे पथक करणार असून खिचडीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले जातील.
शैलेश आढाव, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न) एफडीए
या तपासणी अहवालातून खिचडीतूनच विषबाधा झाली का? खिचडी खाण्यास सुरक्षित होती का? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
आम्हाला शाळेतून 'मुलाची तब्येत बरी नाही म्हणून शाळेत या' अशा निरोपाचा फोन आला. तेव्हा शाळेत गेल्यावर आम्हाला व्हिडियो कॉलिंगवर परिस्थिती दाखवून शांत करण्याचा प्रयत्न शाळेने केला. मात्र, आम्ही पालक जबरदस्तीने रुग्णालयात आलो. आता येथे सध्या मुलं ठीक असली, तरी संध्याकाळपर्यंत डॉक्टर आम्हाला मुलांच्या प्रकृतीविषयी माहिती देतील.
सुप्रिया साळवी, विद्यार्थ्याची आई
हेही वाचा