
घटनेनंतर बोलताना मयंकच्या बहिणीने सांगितले की, "आमचे सर्वस्व हिरावले गेले आहे. आम्हाला न्याय हवा असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे." यासोबतच तिने गर्दीने भरलेल्या डब्यात उपस्थित असलेल्या प्रवाशांपैकी एकानेही आपल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही, असा सवाल उपस्थित केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसादरम्यान लोकलच्या डब्याचे दार उघडे ठेवायचे की बंद, यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मयंक लोहारवर चालत्या लोकलमध्ये चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णा याला घटनेनंतर अवघ्या काही तासांत अटक केली. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याचा माग काढण्यात आला. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
या घटनेनंतर मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी लोकलमधील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे. गर्दीच्या लोकलमध्ये अशा गंभीर घटना घडत असल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा
