कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर इक्बालच्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने दिलेल्या माहितीवरून ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अंदाजे सहा व्यावसायिकांवर गुन्हे नोंदवले आहेत. त्यामध्ये रियाज भाटी, कमल जडवाणी, अफगाण खान आणि अन्य काही व्यावसायिकांची नावे आहेत.
या प्रकरणात पुन्हा रियाज भाटीचे नाव पुढे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आधी इंडोनेशियात बाली इथे छोटा राजनच्या अटकेनंतर रियाज दक्षिण अफ्रिकेत जाण्यासाठी निघाला असताना मुंबईच्या विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी बनावट पासपोर्टप्रकरणी त्याला अटक केली होती. त्यावेळी रियाजजवळ दोन पासपोर्ट सापडले होते. तर दाऊदच्याही तो संपर्कात असल्याच्या वृत्तामुळे पोलिस त्याच्यावर कायम नजर ठेऊन असायचे.
रियाज जरी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत असला. तरी त्या व्यवसायाआड तो अनेक गैरव्यवहार करायचा. गुन्हेगारी क्षेत्रात सर्वप्रथम त्याचं नाव २००७ आणि २००८मध्ये खंडाळ्यात झालेला गोळीबार आणि २००९मध्ये मालाडमध्ये जबरदस्तीनं जमीन काबिज करण्याच्या प्रकरणात आलं होतं.
नुकतीच ठाण्याच्या एका व्यावसायिकाने ठाणे पोलिसांकडे रियाज विरोधात तक्रार नोंदवली होती. एका जागेसाठी रियाजने धमकावल्याचे त्याने तक्रारीत म्हटल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यानुसार रियाजवर गुरूवारी गुन्हा नोंदवला असून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.
हेही वाचा
नीरव मोदीची ५,१०० कोटींची मालमत्ता जप्त, मुंबईतल्या ४ मालमत्तांचा समावेश