प्रवाशांचा रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सरकारने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला यामध्ये प्राधान्य दिलं जात आहे. याचाच एक म्हणून आता कामचुकार आरपीएफ जवानांवर जीओ टॅगद्वारे नजर ठेवली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांसाठी आता जिओ टॅग प्रणाली राबविण्यात येणार आहे. मरेच्या मुंबई विभागातील सीएसएमटी ते खोपोली, कसारा, लोणावळा, इगतपुरी स्थानकांमध्ये नवीन प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळेच मरेच्या स्थानकातील कार्यरत जवानाची सद्यस्थिती समजण्यास मदत होणार आहे.
मरेची व्याप्ती खूप मोठी आहे. सध्या मध्य रेल्वे स्थानकांत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १,५०० पेक्षा जास्त आरपीएफचे जवान कार्यरत असतात. सीएसएमटी, दादर, एलटीटी, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह गर्दीच्या स्थानकात जवानांची संख्या जास्त असते. प्रवाशांची सुरक्षा करताना जवानांकडून कोणताही हलगर्जीपणा किंवा कामचुकारपणा होऊ नये आणि त्यांची सद्यस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावी म्हणून जिओ टॅग प्रणाली वापरली जाणार आहे.
मध्य रेल्वेवरील स्थानकांवर कार्यरत असलेल्या जवानांच्या हाताला हा जिओ टॅग बांधण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे त्यांचं लोकेशन स्पष्ट कळू शकेल. त्या प्रणालीद्वारे तो जवान कार्यरत असलेल्या स्थानकाचा नकाशा तयार केला जाईल. तो नकाशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असलेल्या स्क्रीनवर दिसेल. टॅगमुळे नकाशावर स्थानकातील जवानाच्या हालचाली दिसून येतील. वरिष्ठांनी सुरक्षेसाठी नेमणूक केलेला जवान आपली जागा सोडून अन्यत्र जात असल्यास त्याची माहिती टॅगद्वारे या नकाशावर उपलब्ध होईल.
जिओ टॅग प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी जीपीएसची (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) आवश्यकता आहे. जीपीएससाठी लागणाऱ्या नेटवर्कसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. नेटवर्क उपलब्ध नसेल तर घाट क्षेत्रात तैनात असलेल्या जवानाची सद्यस्थिती समजण्यास अडचण निर्माण होणार आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्यात असून लवकरच ही प्रणाली मरेच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणार आहे.
हेही वाचा -
सामूहिक अत्याचार झालेल्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली
उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक