मुंबईत गर्दुल्यांना अंमली पदार्थ पुरवणाऱ्या तिघा जणांना अंमली पदार्थ विभागा (एएनसी) ने अटक केली आहे. पोलिसांनी घाटकोपर परिसरातून नशा आणणाऱ्या ३७० औषधांच्या बाटल्या तर सायन परिसरातून ३० किलोचा गांजा हस्तगत केला आहे. पोलिसांनी तस्करांची केलेली धरपकड आणि कारवाईमुळे जास्त नशा देणारे अंमली पदार्थ मुंबईत आणणं कठीण झालं आहे. त्यामुळे नशेखोरांनी नशा आणणाऱ्या औषधांची तस्करी सुरू केली आहे.
घाटकोपरच्या गोळीबारनगर परिसरात नशेची औषधं पुरवण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाला मिळाली होती. त्यानुसार एएनसीच्या घाटकोपर युनिटने सापळा लावला होता. यावेळी फिरोज वाजिद अली शेख (३९) हा त्या ठिकाणी आला. पोलिसांना संशयास्पद हालचालींवरून त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या बॅगेत नशेच्या ३७० बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची बाजारात किंमत ७४ हजार रुपये असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
एएनसीच्या वरळी पोलिस युनिटने गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना सायन परिसरातून अटक केली आहे. त्यात एका महिला आरोपीचाही समावेश आहे. मुक्ताबाई मानिक चव्हाण (३०), मोहम्मद शेख (४०) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून १२ लाख रुपयांचा ३० किलो गांजा हस्तगत केल्याचं एएनसीच्या पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
बहुचर्चित उदानी हत्येप्रकरणात आरोपींवर दोषारोपपत्र दाखल
मुंबईत महिलांवरील अत्याचारात ९५ टक्के वाढ; प्रजा फाऊंडेशनचा अहवाल