Advertisement

वरळीच्या कोळीवाड्यात साजरी झाली नारळी पौर्णिमा


SHARES

मुंबईचे भूमिपूत्र अशी ओळख असलेल्या कोळी बांधवांचा प्रत्येक सण म्हणजे उत्साहाची पर्वणी. कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी होळी असो किंवा नारळी पौर्णिमा,
इथला नजारा डोळ्यांचे पारणे फेडणाराच असतो. असाच उत्साह वरळीतील कोळीवाड्यात शनिवारी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला.



'वरळी कोळीवाडा ओनर्स' संस्थेतर्फे येथे पालखीचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने कोळी बांधव, भगिनी सहभागी झाले होते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच पारंपरिक वेषभूषा परिधान केली होती. स्त्रीयांनी लुगडे, अंगावर दागिने, तर पुरूषांनी डोक्यावर टोपी, अंगात सदरा आणि कमरेला नक्षीदार रुमाल अशी वेषभूषा केली होती.



ढोल ताशाच्या तालावर नाचत-गात पालखी गावात फिरवण्यात आली. त्यानंतर बंदरावर जाऊन पालखीतील पाटील जमातीच्या ८ नारळांचे विसर्जन करण्यात आले.



नारळी पौर्णिमा म्हणजे काय?

जूनपासून ऑगस्टपर्यंत समुद्र खवळलेला असतो. या दरम्यान माशांच्या प्रजननाचा काळही असतो. त्यामुळे मासेमारी पूर्णपणे बंद असते. नारळी पौर्णिमाच्या दिवशी सोन्याचा नारळ वाहून खवळलेल्या समुद्राला शांत केले जाते.



यावेळी मासेमारी व्यवसायात प्रगती व्हावी, गावाची प्रगती व्हावी, कोळी बांधवांच्या घरात सुख-समृद्धी यावी, असे मागणे समुद्र देवाकडे मागितले जाते. नारळ वाहिल्यानंतरच मासेमारीला पुन्हा सुरूवात केली जाते.




कसा साजरा केला जातो सण?

नारळी पौर्णिमेला ढोल ताशांचा गजरात आठ पाटील जमातीकडून नारळ घेऊन ते पालखीत ठेवले जाते. या नारळाची मिरवणूक काढून नंतर ते समुद्राला वाहिले जाते. या दिवशी प्रत्येकाच्या घरात नारळाच्या पदार्थांचे गोड जेवण असते, नारळाची खीर, करंज्या, पोहे असे विविध लज्जतदार पदार्थ बनवले जातात. नारळफोडीची स्पर्धा घेतली जाते. मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा