'आपल्याला सात जन्म हाच पती लाभावा' अशी प्रार्थना करण्यासाठी वटपौणिर्मेला वडाची पूजा करण्याची प्रथा आहे. बुधावारी 27 जूनला वटपौर्णिमा असल्याने सकाळपासूनच महिलांचा घोळका वडाच्या झाडाभोवती गोळा होईल. मात्र रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने शहरात वडाच्या झाडांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे यंदा वटपौर्णिमेला पर्यावरण्याच्या दृष्टिने वडाला असलेलं महत्त्व लक्षात घेत वडाचं एक झाड तरी नक्कीच लावा, अशी मागणी पर्यावरणवादी जयेश हरसोरा यांनी केली आहे.
वडाच झाड हे सर्वात दिर्घायुषी असतं. वडाच्या झाडाला अक्षयवृक्ष असही म्हणतात. ज्याचा क्षय होत नाही असं अक्षय्य. वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा उगवतात आणि वडाच्या झाडाचा विस्तार वाढतच जातो. म्हणूच आपल्या पुर्वजांनी वडाच्या झाडाचं महत्व ओळखुन वटपौर्णिमेच्या निमित्याने वटपूजा करण्याची प्रथा रूढ केली.
वटवृक्ष अत्यंत औषधी आणि गुणकारी वृक्ष म्हणून ओळखला जातो. डेरेदार फांद्यांमुळे वर्षाचे बाराही महिने थंडगार सावली देणारा वड वटपोर्णिमेच्या निमित्ताने आराध्य दैवत म्हणून पुजला जातो. वडाच्या फुलाचं, कोंबाचं, डहाळीचं, पानांचं अनेक फायदे आहेत. सर्वाधिक ऑक्सिजन देणारे हे झाड असतं.
वडाच्या झाडाला भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. वड हा आपल्या भारतीय वातावरणात वाढणारा सर्वोत्तम वृक्ष असून पशुपक्ष्यांसाठीसुद्धा उत्तम निवासस्थान असतं. इतर झाडांना अनेकदा बुरशी लागते, वडाच्या तुलनेत त्यांचे आयुष्यही कमी असतं.
आधुनिकीकरणाच्या ओघात गावांचं आणि शहरांचं काँक्रिटीकरण झाल्यानं वटवृक्षाचं अस्तित्व कमी होत चाललं आहे. मुंबईत वडाच्या झाडाचं प्रमाण 20 टक्क्यापेक्षापही कमी आहे. दर पाच झाडांमध्ये एक झाड वडाचं असायला हवं. मात्र हे प्रमाण मुंबईत अतिशक कमी आहे. रस्त्यांचं रुंदीकरण, वाढत जाणाऱ्या इमारतींची संख्या यामुळे झाडांच्या फांद्या छाटल्या जातात त्याचा झाडाच्या विस्ताराबरोबरच निसर्गचक्रावरही परिणाम होतो. मुंबईच्या वडाळा परीसरात सर्वाधिक वटवृक्ष आहेत.
जयेश हरसोरा, पर्यावरणवादी
वडाचं झाड मिळाले नाही तर त्याची फांदी आणून त्याची पुजा करण्याची वेगळीच प्रथा शहरांमध्ये सुरू झाली आहे. त्यापेक्षा जागोजागी वटवृक्षाची लागवड केली तर त्याचा फायदा नक्कीच होईल.