Advertisement

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाज्वल्य पत्रकारिता


स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाज्वल्य पत्रकारिता
SHARES

लेखक : देवेंद्र भुजबळ

(श्री. देवेंद्र भुजबळ हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक या पदावर कार्यरत आहेत. तथापि या लेखातील त्यांची मते, निरीक्षणे पूर्णपणे व्यक्तिगत आहेत.)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 134 वी जयंती 28 मे 2017 रोजी आहे. त्यांना आपल्यातून जाऊन जवळपास 51 वर्षे झाली आहेत. पण जसजसा काळ पुढे सरकत आहे, तसतसे सावरकरांचे विचार, कार्य हे किती दूरदृष्टीचे होते, याची आपणास पदोपदी जाणीव होत आहे. सावरकरांच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची पत्रकारिता होय. सावरकरांची पत्रकारिता ही साधीसुधी पत्रकारिता नव्हती तर, ती अत्यंत जाज्वल्य होती. परिस्थितीवश त्यांना स्वत:चे वृत्तपत्र काढता आले नाही. पण म्हणून गप्प न बसता, त्यांनी तत्कालीन अनेक वृत्तपत्रांतून आपले परखड व दूरदृष्टीचे विचार वेळोवेळी मांडले. काही प्रसंगी त्यांनी आपले विचार पत्रके प्रकाशित करुनही मांडले. ही त्यांची पत्रके सुद्धा एक प्रकारची पत्रकारिताच होय.

बालवयातच पत्रकारिता

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जवळच्या भगूर गावी सोमवार 28 मे 1883 रोजी झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. बालपणापासूनच त्यांनी आपले प्रखर विचार मांडण्यासाठी लेखणीचा आधार घेतला. नाशिकला माध्यमिक शाळेत शिकत असतानाच “हिंदू संस्कृतीचा गौरव” या शीर्षकाखाली त्यांनी “नाशिक वैभव” या वृत्तपत्रात दोन भागात लेख लिहीला. सातवा राजा एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभाच्या सुमारास 1901 साली एक सभा झाली. या सभेच्या अध्यक्षांनी “एडवर्ड हे आपले खरोखरच बाप आहेत!” असे गौरवोद्गार काढले होते. ही सभा संपल्यानंतर अल्पावधीतच खोचक, धारदार प्रश्न विचारणारी पत्रके फडकली. या पत्रकात म्हटले होते, “एडवर्ड जर तुमचे बाप आहेत, तर तुमचे वडील तुमच्या मातुश्रीचे कोण ?”

महाविद्यालयातही पत्रकारिता 

सावरकर डिसेंबर 1901 मध्ये मॅट्रिक पास झाले आणि जानेवारी 1902 मध्ये त्यांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयात त्यांनी समविचारी तरुणांचा एक प्रभावी गट स्थापन केला. या गटाने “आर्यन विकली” या नावाचे एक हस्तलिखित साप्ताहिक चालू केले. देशभक्ती, साहित्य, इतिहास, विज्ञान अशा अनेक विषयांवर सावरकरांनी या साप्ताहिकातून अनेक शैलीदार, उद्बोधक लेख लिहिले. त्यातील विचारप्रवर्तक लेखांना पुण्याच्या वृत्तपत्रांमध्येही स्थान मिळाले. यापैकी एक उत्कृष्ट लेख म्हणजे “सप्तपदी” होय. या लेखात त्यांनी “परतंत्र राष्ट्र आपली उत्क्रांती करुन घेत असताना कोणकोणत्या टप्प्यांमधून जात असते” याचे विवेचन केलेले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी “काळ” वृत्तपत्रात (संपादक शिवरामपंत परांजपे) उपसंपादक म्हणून एवढेच नाही तर, छापखान्यात जुळारी म्हणूनही नोकरी करण्याची इच्छा दर्शविली होती. पण या विनंतीला अनुकूल उत्तर आले नाही. दरम्यान सावरकरांच्या सासऱ्यांनी मदतीचे आश्वासन दिल्याने ही कल्पना आपोआप मागे पडली. सावरकरांनी 1902 साली  “काळ” वृत्तपत्रात लिहिले होते, “हिंदुस्थानचे दारिद्र्यास व सर्व प्रकारचे अनास्थेस कारण हिंदू लोक होत. परंतु, जर कधी त्यांना वैभवाचे दिवस हवे असतील तर त्यांनी हिंदूच राहिले पाहिजे.”  भविष्याचा वेध घेणारे असेच हे विचार होत. 

डिसेंबर 1905 मध्ये पदवी संपादन केल्यावर सावरकर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबईला गेले. कायद्याचा अभ्यास करतानाच मुंबईत त्यांनी प्रचाराचे कार्यही सुरु ठेवले. ते “विहारी” या मराठी साप्ताहिकात लेख लिहू लागले आणि त्यांनी ते पत्र अभिनव भारतचे मुखपत्र बनविले. बंगालमध्ये 1906 साली चालू झालेल्या “युगांतर” या जहाल समविचारी साप्ताहिकाप्रमाणेच “विहारी”चा खपही तडाख्याने वाढू लागला.

इंग्लंडमधून पत्रकारिता

युरोपात जाऊन अभ्यास करु इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी लंडनमध्ये राहात असलेल्या पंडित श्यामजी कृष्णवर्मा यांनी काही शिष्यवृत्त्या देऊ केल्या. सावरकरांचा अर्ज, अर्जासोबतचे लोकमान्य टिळकांचे प्रशस्तीपत्र आदींचा विचार होऊन सावरकरांना ही शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी 9 जून 1906 रोजी “पर्शिया” बोटीने मुंबई बंदर सोडले. लंडनमध्ये गेल्यावर तेथील समाजाचा, संस्कृतीचा सावरकरांनी स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही. उलट आपले राष्ट्रकार्य ते अधिक खंबीरपणे करु लागले. भारतासाठी होमरुलची मागणी करणारी पुस्तिका प्रकाशित केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाने सेनापती बापट यांना मिळणारी सर मंगलदास नथूभाई शिष्यवृत्ती बंद केली. यावर सावरकरांनी आपल्या “लंडनच्या बातमीपत्रात” तिखट प्रश्न विचारला होता की, “स्वदेशाने गुलामगिरीत पडावे असे म्हणेल, त्यासच ही माझी शिष्यवृत्ती द्यावी, अशी एखादी अट मंगलदास नथुभाईंनी शिष्यवृत्ती ठेवते वेळी घातली होती काय ?” लंडनमध्येही आपल्या क्रांतीकारी कल्पनांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पत्रके, पुस्तिका, ग्रंथ या साधनांचा वापर केला.  पहिल्या सहा महिन्यातच त्यांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद केला. महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रांनी या पुस्‍तकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. 

लंडनमधील भारत निवासमध्ये राजकीय तत्वज्ञानावर उच्च दर्जाची आणि स्फूर्तिदायक चर्चा होत असे. सावरकरांनी लंडनहून पाठविलेल्या बातमीपत्रांमधून या चर्चांचा प्रतिध्वनी साऱ्या भारतभर उमटत असे. ही बातमीपत्रे महाराष्ट्रात मोठ्या उत्सुकतेने वाचली जात असत. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रभाव निर्माण होण्यासाठी सावरकरांनी न्यू यॉर्कच्या “गॅलिक अमेरिका” या वृत्तपत्रातून भारतीय घडामोडींवर प्रभावी लेख लिहिले. या लेखांचा त्यांनी जर्मन, फ्रेंच, इटालियन, रशियन, पोर्तुगीज या भाषांमध्ये अनुवाद करुन ते त्या-त्या देशात प्रसिद्ध करण्याची व्यवस्था केली.

साप्ताहिक तलवार

अभिनव भारत संघटनेचे मुखपत्र म्हणून “तलवार” साप्ताहिक सुरु करण्यात आले. पहिल्याच अंकात 1908 सालात उद्भवलेल्या ‘कील’ कालव्याच्या राजकारणातली गुंतागुंत उलगडून दाखवून आगामी चारपाच वर्षाँच्या अवधीत युरोपमध्ये पेटणाऱ्या युद्धाच्या संभाव्यतेची सावरकरांनी चिकित्सक मीमांसा केली होती. गुप्त संघटना उभारण्याचे किंवा दबा धरुन गनिमी युद्ध लढण्याचे आम्हाला काही विशेष मोठे प्रेम आहे अशातला प्रकार नाही. परंतु जेव्हा प्रपीडक हिंसा सत्तारुढ झालेली असते आणि ती सत्याच्या प्रचाराला नि आचाराला प्रतिबंध करते, तेव्हा आणि तेव्हाच गुप्त संघटना आणि गनिमी युद्ध यांची कृती समर्थनीय ठरते. कारण या परिस्थितीत हिंसक सत्तेला उखडून टाकण्यासाठी सशस्त्र प्रतिकार हेच काय ते एकमेव नि अपरिहार्य साधन उरलेले असते.

सावरकर पुढे म्हणतात : “अन्यायी शक्तींकडून राष्ट्रीय नि राजकीय उत्क्रांतीची नैसर्गिक प्रक्रिया जेव्हा बळाने दडपून टाकली जाते, तेव्हा स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून या उत्क्रांतीच्या जागी क्रांती पदार्पण करते. म्हणूनच सत्य आणि न्याय यांना सिंहासनारुढ करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या या क्रांतीचे सहर्ष स्वागत केले पाहिजे.”  अखेरीस तेजस्वी समारोप करताना ते म्हणतात, “ तुम्ही संगिनीच्या जोरावर राज्य चालवता आणि आम्हाला घटनात्मक आंदोलनाचा उपदेश ऐकवता. जेथे कसलीच घटना मुळात अस्तित्वातच नाही तेथे घटनात्मक आंदोलनाची भाषा ही शुद्ध कुचेष्टा ठरते. एखाद्या राष्ट्रात घटना अस्तित्वात असेल आणि ती त्या राष्ट्राच्या परिपूर्ण आणि विमुक्त विकासाला मोकळेपणाने अवसर देत असेल, तर मात्र त्या राष्ट्रात क्रांतीची भाषा ही केवळ कुचेष्टा ठरेल. एवढेच नव्हे तर, तो मोठा अपराध ठरेल. तुम्ही आमच्या तोफा हिसकावून घेतल्या आहेत, म्हणून आम्ही पिस्तुले उचलली आहेत. तुम्ही आम्हाला प्रकाश नाकारला आहे, म्हणून आम्ही अंधाराचा आधार घेतला आहे आणि या अंधारात एकत्र जमून आमच्या मातृभूमीला जखडून टाकणाऱ्या बेड्या तोडून टाकणारे घणाघात कसे घालावेत, याचा विचार आम्ही चालविला आहे.” ही गोष्ट समोर ठेवून प्रेरक साहित्य लिहिणे, छापणे नि त्याचा प्रसार करणे यात सावरकर गढून जात.

1908 साली 1857 च्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिसमारंभावेळी सावरकरांनी “हे हुतात्म्यांनो !” या शीर्षकाखाली एक तेजस्वी पत्रक प्रसृत केले. या पत्रकात त्यांनी म्हटले होते की, हुतात्म्यांनो ! तुम्ही केलेली घोषणा आम्ही उचलून धरतो, तुम्ही उभारलेला ध्वज आम्ही परमपूज्य मानतो. हायगेट येथे 10 मे 1908 रोजी भरलेल्या सभेला युरोपच्या विविध भागातून शंभर एक भारतीय विद्यार्थी आले होते. त्यांना आणि इंग्लंडमध्ये हे पत्रक वाटण्यात आले.  त्याच्या शेकडो प्रती भारतातही पाठविण्यात आल्या.

सावरकरांची शोध पत्रकारिता

ब्रिटिश सरकारने भारतात केलेल्या अत्याचारांचा बदला म्हणून मदनलाल धिंग्रा यांनी या अत्याचारांना जबाबदार असणाऱ्या सर विल्यम कर्झन वायली यांचा 1 जुलै 1909 रोजी वध केला. या वधाने ब्रिटन व भारत हादरुन गेले होते. या संदर्भातील पत्रकात सावरकरांनी म्हटले होते, ''धिंग्रांचे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्यामुळे, त्यांना आधीच दोषी ठरविण्याचा आणि न्यायालयाच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा कोणालाही अधिकार नाही. 

सत्र न्यायालयात वाचावयाचे धिंग्रांचे निवेदन पोलिसांनी काढून घेतले होते. पण धिंग्रांनी फाशी जाण्यापूर्वी पोलिसांनी दाबून टाकलेले ते निवेदन सावरकरांना प्रसिद्ध करावयाचेच होते. त्याप्रमाणे त्यांनी धिंग्रांच्या निवेदनाच्या प्रती छापून घेतल्या. श्यामजी कृष्णवर्मांनी पॅरीसला जाऊन तेथून त्या निरनिराळ्या अमेरिकन व आयरिश वृत्तपत्रांकडे पाठवून दिल्या. इंग्लंडमधील वृत्तपत्रात हे निवेदन प्रसिद्ध होणे फार कठिण होते. पण ते तेवढेच आवश्यक होते म्हणून सावरकरांनी आपला स्नेही डेव्हिड गार्नेट याच्याकडे त्या निवेदनाची प्रत दिली. गार्नेटने ते निवेदन “डेली न्यूज” या वृत्तपत्रातील रॉबर्ट लिड यांच्याकडे दिले. लिडने ते निवेदन 16 ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले आणि सारे इंग्लंड हादरुन गेले. आपल्या कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले निवेदन प्रसिद्ध झाल्याचे पाहून पोलिसही हतबल झाले. 

अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर ग्रंथ

 “अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर” या सावरकरांनी लिहिलेल्या ग्रंथावर प्रकाशनापूर्वीच सरकारने बंदी आणली.  सावरकरांनी हे आव्हान स्वीकारुन ब्रिटिश, अमेरिकन, युरोपियन, वृत्तपत्रांमधून सरकारची खिल्ली उडवली. अखेर सावरकरांनी तो ग्रंथ 1909 साली हॉलंडमध्ये “दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ 1857” या नावाने छापून घेतला. हिंदुस्थान, फ्रान्स, अमेरिका, जपान, चीन या देशांमध्ये या ग्रंथाच्या प्रती सुखरुप जाऊन पोचल्या. पुढे अनेक भाषांमध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. मुंबईच्या “फ्री हिंदुस्तान” या वृत्तपत्राने काढलेल्या सावरकर विशेषांकात लिहिताना के.एफ. नरिमन यांनी म्हटले होते, “ 1857 च्या महान क्रांतीवर आणि बंडावर वीर सावरकरांनी लिहिलेल्या आणि  सरकारने बंदी घातलेल्या ग्रंथामधूनच आझाद हिंद सेनेची कल्पना आणि त्यातही विशेषत: झाशीच्या राणीचे पथक उभारण्याची कल्पना निघाली असावी असे दिसते. याच अंकात बेझवाडा येथील “गोष्टी” चे संपादक जी.व्ही. सुब्बाराव यांनीही या ग्रंथाची मुक्तकंठाने थोरवी गायली. इतिहास घडविण्याच्या बाबतीत सावरकर हे रुसो, व्हॉल्टेअर आणि मॅझिनी यांच्या श्रेणीत असणारे प्रतिभाशाली, नव्या युगाचे उद्गाते, क्रांतीचे निर्माते आहेत, असे गौरवोद्गार काढले.

सावरकरांवर खटला

धिंग्रांच्या हौतात्म्यानंतर भारतात सावरकरांचे अनुयायी, साथी यांचा छळ सुरु झाला. त्यांच्यावर खटले दाखल झाले. बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या शिक्षेचा सूड उगविण्यासाठी अनंत कान्हेरे या तडफदार, निधड्या छातीच्या तरुणाने नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याला 21 डिसेंबर 1909 रोजी गोळी घालून ठार मारले.  जॅक्सन खून प्रकरणात सावरकरांनाही दोषी ठरविण्यात आले. त्यांनी धिरोदात्तपणे या परिस्थितीला तोंड दिले. 

सावरकरांवर एकूण 38 दोषारोप ठेवण्यात आले होते. एकूण 68 दिवस खटला चालून त्यांना सर्व मालमत्ता जप्त करण्याची आणि जन्मठेप काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. निकालपत्रात न्यायमूर्तींनी सावरकरांच्या “वंदे मातरम्” या पत्रकातील उतारा दिला होता. या उताऱ्यात सावरकर म्हणतात “नोकरशाहीला गलितगात्र करुन सोडण्यास आणि जनतेची उठावणी घडून आणण्यास, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या राजकीय वधाची मोहिम हीच प्राप्त परिस्थितीत सर्वोत्कृष्ट पद्धत आहे.”  या निकालपत्रात न्यायमुर्तींनी शेवटी म्हटले होते “युद्धाला चिथावणी देण्याऱ्या छापील वाङमयाचा प्रसार करुन शस्त्रास्त्रांचा पुरवठा करुन आणि स्फोटकांच्या निर्मितीचे शिक्षण देण्याची सोय करुन, आरोपीने युद्धाला प्रोत्साहन देण्याचा गुन्हा केल्याचे आमच्या दृष्टीने सिद्ध झाले आहे.

अंदमानच्या तुरुंगातूनही पत्रकारिता

अंदमानच्या तुरुंगात शारिरिक, मानसिक कष्ट, हाल-अपेष्टा, अतोनात छळ सोसत असूनही सावरकर खचले नव्हते.  अशाही परिस्थितीत त्यांनी गुप्तपणे पत्रकारिता सुरुच ठेवली होती. बातमीसाठी सावरकरांनी एकदा लिहिलेली चिठ्ठी पकडली गेली. त्यामुळे त्यांना हातकडीत टांगण्याची शिक्षा झाली. त्यावेळी जेलर बारीने त्यांना विचारले, “हे कशासाठी हो”? त्यावर सावरकर म्हणाले “हा बातमीसाठी भरलेला टपाल खर्च आहे”, त्यावर बारी म्हणाला “तुम्हाला बातमी बरीच महाग पडली म्हणायची !” यावर सावरकर ताडकन् उद्गारले “छे, मुळीच नाही! तुम्हाला बातमीसाठी वृत्तपत्रांची वर्गणी भरुन वर टपाल खर्चही द्यावा लागतो. आम्हाला बातमी फुकट मिळते ! मात्र हा असा टपालखर्च तेवढा वर्षातून एक दोन वेळा भरावा लागतो.”

क्रांतीकारक इंदूभूषण आणि उल्लासकर यांच्या छळाचे आणि हौतात्म्याचे थरारक वृत्तांत भारतीय वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले. ब्रिटिश अधिकारी त्यामुळे हादरले. वृत्तपत्रातून झालेली टिका, मध्यवर्ती मंडळात विचारले गेलेले प्रश्न, लोकमताचे वाढते दडपण, या सर्वांचा सरकारवर दबाव पडला. शेवटी 1913 साली सर रेजिनाल्ड क्रॅडॉक याने अंदमानला भेट दिली, प्रत्यक्ष पाहणी केली, कैद्यांशी बोलणे केले. सावरकरांची 16 नोव्हेंबर 1913 रोजी क्रॅडॉकशी भेट झाली. सर्व प्रांतिक वृत्तपत्रांमधून सावरकरांची अंदमानातून पाठविलेली पत्रे छापली जाऊन त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

रत्नागिरी तुरुंगात

सावरकरांना अंदमानहून रत्नागिरी तुरुंगात हलविण्यात आले. रत्नागिरीच्या या तुरुंगातच सावरकरांनी ‘ हिंदुत्व’ हा अमर प्रबंध लिहून, तुरुंगातून गुप्तपणे बाहेर पाठवला. सावरकर तुरुंगात असल्यामुळे तो ‘मराठा’ या टोपण नावाखाली प्रसिद्ध करण्यात आला. या प्रबंधात हिंदू राष्ट्रवादाची तत्वे हिंदू राष्ट्र आणि हिंदू राजकारण यांची संपूर्ण चळवळ या प्रबंधावर आधारलेली आहे. 

सावरकरांची मुक्तता

सावरकरांची काही अटींवर 6 जानेवारी 1924 रोजी सुटका करण्यात आली. सावरकरांचे पूर्व सहकारी शिवरामपंत परांजपे यांचा दृष्टिकोन पूर्वीहून बदलला होता. पूर्वीच्या महान क्रांतीकारकाचे विकृत रुपांतर झालेले सावरकरांना आढळले. परांजपे ‘नवाकाळ’ या नव्या संकल्पित दैनिकाविषयी सावरकरांशी बोलले त्यावेळी सावरकर कोटी करुन तटकन् उद्गारले, “मी ‘नवाकाळ’ ओळखीत नाही. मी जुना ‘काळ’ तेवढाच जाणतो.

अस्पृश्यता निर्मूलन

सावरकरांच्या अस्पृश्यता निर्मूलनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या ‘जनता’ पत्राने पाठिंबा दिला. याच्या आधी काही दिवस सावरकरांनी एक पत्रक काढले होते आणि डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी नाशिकला चालविलेल्या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला आपला पाठिंबा व्यक्त केला होता. ‘दलित वर्गाच्या हिंदूंना काळाराम मंदिर उघडे करा’, अशी नाशिकच्या सवर्ण हिंदूंना सावरकरांनी त्या पत्रकाद्वारे विनंती केली होती. भाऊराव गायकवाड यांनी नाशिकच्या सवर्ण हिंदूंमध्ये ते पत्रक वाटले. अखिल भारतीय गुरखा लिगचे अध्यक्ष ठाकूर चंदनसिंग यांनी सावरकरांच्या लेखांचे अनुवाद करुन ते ‘तरुण गुरखा’, ‘हिमालयन टाइम्स’ यांमध्ये प्रसिद्ध केले होते. 

विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन

सावरकरांचा दृष्टीकोन संपूर्णत: आधुनिक, विज्ञाननिष्ठ आणि धर्मनिरपेक्ष होता. मानवजातीच्या हिताला जे साधक ते चांगले आणि तिच्या प्रगतीला जे बाधक ते वाईट, अशी त्यांची विचारसरणी होती. यंत्र हा शाप नसून ते मानवाला मिळालेले वरदान आहे. बेकारी हा यंत्राचा दोष नसून तो विषम वाटणीचा आहे, असे प्रतिपादन सावरकर कटाक्षाने करित. या विषयांवर लिहिलेल्या एका लेखात त्यांनी निरिश्वरवादी रशियाच्या अंतराळ प्रगतीचे वर्णन करुन विज्ञानाची कास धरण्याचे हिंदूंना कळकळीचे आवाहन केले आहे. मानव हातासाठी नव्हे तर मानव हितासाठी विज्ञानाचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट मनुष्यजातीने ठेवले तर, विज्ञान हे वरदान ठरेल, असा निष्कर्ष सावरकरांनी काढला आहे.

सावरकरांनी 1935 साली किर्लोस्कर मासिकात मूर्तीपूजेवर एक विशेष लेख लिहिला होता. या लेखात ते म्हणतात, जशी एक धार्मिक मूर्तीपूजा आहे, तशीच एक बौद्धिक मूर्तीपूजाही आहे. ती बुद्धिवादाच्या कसोटीस पूर्णपणे उतरते.  परंतु आपल्याकडील लोक समाधी-कबरींचे दर्शन घेतात, ते नवसास पावतात, मुले देतात. उपाहाराचा भोग घेतात, न भोग दिला तर रागावतात. या भावनेने या प्रकारास मात्र बुद्धिवाद धर्मवेड म्हणतो. तुरुंगात चांगल्या रीतीने वागविले जावे यासाठी जितेंद्रनाथने तेथेच उपोषण करुन बलिदान केले, हे कसे चूक आहे, हे सांगताना सावरकर एका लेखात म्हणतात, “राजकीय बंदिवानांना कितीही बऱ्या रितीने वागविले तरी काय? स्वत:स बंदिवान म्हणून घेण्याचे दौर्बल्य तर राहणारच नं? अगदी खुर्चीवर बसून जरी ताजे पत्र वाचीत राहिले तरी इंग्रजांचा बंदिवानच!

''आजच्या तिबेटमधील गमती जमती'' या लेखात ते आपला नितीविषयक दृष्टीकोन स्पष्ट करतात. निती, अनिती या वस्तू चौकोन वा त्रिकोणाप्रमाणे ठराविक साचाच्या, एकठशी, एकछापी, त्रिकालाबाधित असतात. किंवा पुराणात जे चांगले ते म्हणून वा वाईट म्हणून सांगितले आहे, तेच सर्व परिस्थितीत, सर्व मनुष्य समाजात. चांगले वा वाईट ठरलेच पाहिजे, हा हट्ट चुकीचा आहे. आपणास जो उपचार शुद्ध आणि हितकर वाटतो, तो आपण आचरावा. पण तो सनातन, त्रिकालाबाधित, ईश्वरोक्त ''धर्म'' होय आणि इतर साऱ्या परिस्थितीतही तोच मानला पाहिजे, असा धर्मवेडा दुराग्रह मात्र धरु नये. 

साप्ताहिक श्रध्दानंद

सामाजिक सुधारणेच्या आपल्या महान कार्याला पूरक म्हणून आणि प्रचलित राजकारणावरील आपली मते गुपचूप मांडता येण्याचे साधन म्हणून डॉ. सावरकर यांच्या संपादकत्वाखाली मुंबई येथून सावरकारांनी  ‘श्रध्दानंद’ नावाचे एक साप्ताहिक सुरु केले होते. त्यामधून सावरकारांचे अनेक स्फूर्तीदायक लेख प्रसिध्द होत. ते लेख त्यांच्या नावावर प्रसिध्द होत नसले तरी, त्यांचा एकदंर सूर आणि शैली यावरुन ते कोणाचे आहेत, हे महाराष्ट्राला कळून चुकले होते. हे साप्ताहिक अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाले होते आणि त्याचा खपही भरपूर वाढला होता.

सावरकरांची सुटका

लोकशाही स्वराज्य पक्षाचे नेते जमनादास मेहता यांच्या प्रयत्नांमुळे अखेर 10 मे 1937 रोजी सावरकरांची बिनशर्त सुटका करण्यात आली. सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सावरकरांनी पुन्हा राजकीय जीवनात आणि संघर्षात पदार्पण केले. सावरकरांचे एक पूर्व सहकारी वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हे युरोपात होते. ते कम्युनिस्ट बनले असल्याची चर्चा होती. पण ते ट्रॉटस्कीवाद्यांच्या गोटात शिरल्यामुळे स्टालिन सरकारने त्यांना गोळी घालून ठार मारले असल्याचे वृत्त पसरले होते. सावरकर हे एकमेव भारतीय नेते होते की, ज्यांनी याविषयी एक पत्रक काढून वीरेंद्रनाथांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या मृत्यूविषयी ब्रिटिश, रशियन या दोन्ही सरकारांनी मौन पाळले.

सुभाषचंद्र बोस रहस्यमय रीतीने गायब झाल्यानंतर सावरकरांनी एक पत्रक काढले आणि इतर कोणाही पुढाऱ्यापेक्षा वेगळी वृत्ती दाखवून म्हटले, “ ते कोठेही असले तरी, उभ्या राष्ट्राची कृतज्ञता, संमती, सदिच्छा यांच्यापासून त्यांना सदैव स्फूर्ती, समाधान लाभो! ते कोणत्याही स्थळी असोत, भारतीय स्वातंत्र्याच्या काजासाठी प्रकृती वा प्राण यांची पर्वा न करता, ते आपले जीवनसर्वस्व वेचीत राहातील, याविषयी मला संशय नाही.”

अखंड राष्ट्राची भूमिका

सावरकरांची भूमिका देशभक्तीची नि व्यवहारी वृत्तीची होती. 10 ऑगस्ट 1942 रोजी काढलेल्या एका पत्रात ते म्हणाले, “भारत-ब्रिटनसह भारत स्वतंत्र नि समान भागीदार असल्याची ब्रिटिश लोकसभेने घोषणा करणे आणि लगेच ती घोषणा कृतीत आणणे, हाच चालू समस्येवरचा एकमेव तोडगा आहे.” बाँबे क्रॉनिकलच्या 26 ऑगस्ट 1942 च्या अंकात त्यांच्या लंडनच्या वार्ताहराने लिहिले होते, ‘सावरकरांनी ब्रिटिश जनतेला उद्देशून केलेल्या आवाहनाला इकडच्या वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिध्दी दिली. ‘टाइम्स,’ ‘मँचेस्टर गार्डियन,’ ‘डेली हेरल्ड,’ ‘न्यूज क्रॉनिकल,’ आणि ‘यॉर्कशायर पोस्ट’, या प्रमुख वृत्तपत्रांनी ठळक मथळे देऊन पण कोणतेही भाष्य न करता, हे निवेदन लोकांच्या नजरेत भरेल अशा रीतीने प्रसिध्द केले.

भारताचे स्वातंत्र्य

15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला.  भारत स्वतंत्र झाला. तो देशात राष्ट्रीय महोत्सव दिन म्हणून आनंदाने साजरा केला. भारतीय स्वातंत्र्याच्या रुपाने आशियामध्ये एक महान शक्ती अवतीर्ण झाली होती. पण देशाच्या फाळणीमुळे पंजाबमध्ये जागोजागी दंगली उसळल्या, जाळपोळ, खून, लुटालूट आणि सर्व प्रकारचे गुन्हे यांनी थैमान घातले. प्रचंड लोकसंख्येने स्थलांतर केले. पुढील काही काळ देशात अशांतताच होती.

महात्मा गांधींचे हौतात्म्य

शुक्रवार दि. 30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रार्थना स्थळाच्या वाटेवर महात्मा गांधींवर नथुराम गोडसे यानी गोळी घातली. गांधी वधाचे वृत्त सर्वत्र पसरताच देश शोकसागरात बुडाला. 31 जानेवारीलाच सावरकरांनी एक पत्रक काढून त्यात म्हटले की, “महात्मा गांधींच्या अवचित वधाचे वृत्त आत्यंतिक धक्का देणारे आहे. या प्रसंगी जनतेने स्वतंत्र भारताच्या केंद्रीय सरकारच्या पाठीशी उभे राहावे आणि देशात सुव्यवस्था राखण्यास सर्वतोपरी सहकार्य द्यावे, अशी माझी जनतेला विनंती आहे.” सावरकरांचे अंगरक्षक- अप्पा कासार, वैयक्तिक कार्यवाह- गजाननराव दामले यांना गांधीवधानंतर आठ तासांनीच रातोरात अटक करण्यात आली होती.

सावरकरांना अटक

सर्व समंजस माणसांनी गांधीवधाच्या कृत्याचा नि:संदिग्धपणे निषेध केला होता. अटक होण्यापूर्वी काही तासच आधी सावरकरांनी एक पत्रक काढले होते आणि हिंदू महासभेच्या कार्यकारिणीचे सदस्य भोपटकर यांनी ‘महात्मा गांधींच्या भीषण वधाचा धिक्कार करणारे जे संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले होते, त्याला परिपूर्ण दुजोरा दिला होता. 

त्या पत्रकात पुढे सावरकरांनी म्हटले होते, “हिंदू महासभेचा एक उपाध्यक्ष या नात्याने मीही या नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावनांशी संपूर्ण सहमत आहे. असे आप्तवधाचे गुन्हे वैयक्तिक क्षोभाने झालेले असोत वा सामूहिक क्रोधाच्या भरात घडलेले असोत, ते मी सर्वथैव धिक्कारार्ह मानतो.”  त्या पत्रकात अखेरीस सावरकरांनी म्हटले होते : “कोणत्याही राष्ट्रीय क्रांतीला, नवजात राष्ट्रीय सत्तेला अरिष्टकर ठरणारा सर्वाधिक मोठा शत्रू जर कोणता असेल, तर तो म्हणजे बंधूघातकी यादवी युद्ध हा होय. आणि विशेषत: आपले राष्ट्र परकीय शत्रूंनी वेढलेले असताना तर अशा यादवीपासून फारच मोठा धोका असतो, हा इतिहासाचा कडक इशारा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने आपल्या अंत:करणावर कोरुन ठेवला पाहिजे.”

निर्दोष मुक्तता

महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी सावरकरांना अटक झाली. सात महिने न्यायालयाचे कामकाज चालल्यानंतर  10 फेब्रुवारी 1949 रोजी न्यायालयाने आपला निकाल दिला. या निकालपत्रात न्यायाधीशांनी आपला निर्णय घोषित केला, “विनायक दामोदर सावरकर यांच्यावर ठेवलेले आरोप सिद्ध झाले नसून ते दोषी नाहीत, असे आढळून आले आहे आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. ते कैदेत आहेत. इतर काही कारण नसल्यास त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावे.”

भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना

26 जानेवारी 1950 या दिवशी सार्वभौम लोकशाही भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त काढलेल्या पत्रकात सावरकरांनी भूदल, नौदल नि वायूदल या तिन्ही लढाऊ दळांत लक्षावधींच्या संख्येने भरती होण्याचे हिंदू तरुणांना आवाहन केले. ते पुढे म्हणाले, “आपल्या राष्ट्राच्या मोक्याच्या सीमा अजूनही आपल्या हातात आहेत. केवळ सुरम्य सिद्धांताची सुगीते गाऊन आपण त्यांची मैत्री संपादन करु शकणार नाही. अशी वेडगळ धोरणे ठेवली, तर दीर्घकालीन रक्तरंजीत लढा देऊन आपण जे काही कमावले आहे ते सर्व आपण गमावून बसू. दुसरा ज्या तऱ्हेने आपल्याशी वागतो, त्याच तऱ्हेने त्याच्याशी वर्तन ठेवणे, हाच आपले अस्तित्व टिकविण्याचा एकच एक मार्ग आहे. आपले राष्ट्र टिकवायचे असेल, यशस्वी बनवायचे असेल, तर ‘जशास तसे’ हेच एकमेव धोरण ठेवल्याखेरीज आपणास गत्यंतर नाही.”

लिपी सुधारणा

सावरकरांनी लिपी सुधारणेकडे विशेष लक्ष दिले. राजकारणात भाग घेण्यास प्रतिबंध असल्यामुळे, सामाजिक सुधारणा, लिपी सुधारणा, पंचांग-सुधारणा या गोष्टींकडे सावरकरांनी आपले लक्ष वळविले. या विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांमधून अनेक लेख लिहिले, पुस्तके प्रसिद्ध केली आणि मुंबईत अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. सावरकरांनी छापखान्यातील नागरी टंकांची संख्या 250 वरुन 80 वर आणून दाखविली होती. उच्चारशास्त्राच्या दृष्टीने नागरी ही सार्वाधिक शास्त्रीय लिपी आहे, असे सावरकरांनी विशद करुन सांगितले. ‘राष्ट्रीय पंचांगाची आवश्यकता’ या विषयावर 1951 सालात त्यांनी ‘केसरी’ मध्ये दोन लेख लिहिले. 

सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी शब्द सुचविले आणि ते प्रचारात आणले. ‘मेयर’ ला ‘महापौर’ , ‘बजेट’ ला ‘अर्थसंकल्प’ टेलिव्हिजन’ ला ‘दूरदर्शन’, ‘टेलिप्रिंटर’ ला ‘दूरमुद्रक’, हे त्यांनी सुचवलेले शब्द तर हा-हा म्हणता लोकांच्या तोंडी रुढ झाले.  

महाराष्ट्राची स्थापना

1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यावेळी मराठी जनतेला, राज्याला उद्देशून दिलेल्या समयोचित संदेशात सावरकरांनी म्हटले होते, ‘ महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त व्हावा, अशी माझी इच्छा आहे. असाही एक दिवस उजाडेल की, ज्या दिवशी आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतंत्र, स्वायत्त भारताचा झेंडा पुन्हा एकवार अटकेवर फडकावून भारताचे पंतप्रधान होतील.’

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी कवी यशवंतांना महाराष्ट्राचे राजकवी ही पदवी अर्पण केली. साताऱ्याला एक सैनिकी विद्यालय सुरु केले. या दोन गोष्टींसाठी सावरकरांनी चव्हाणांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र सरकारने मराठी ही प्रशासनाची भाषा ठरवली, म्हणून सावरकरांनी राज्य सरकारचेही अभिनंदन केले.

सावरकरांचे आत्मार्पण

त्यांनी 1965 साली लिहिलेल्या एका लेखात, त्यांच्या दृष्टीसमोर तरळणाऱ्या अंत:काळाची सूचक कल्पना मांडली होती. सावरकर त्या लेखात म्हणाले होते, ‘अत्यंत असमाधानाने विफलतेच्या तीव्र जाणिवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून, अत्यंत अतृप्त अशा मनस्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारणत: ‘आत्महत्या’ म्हटले जाते. परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू पूर्णपणे सफल झालेला आहे, अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास ‘आत्मार्पण’ असे म्हणतात. या परिवर्तनशील किंवा अखंड विकसनशील जगात सर्वतोपरी परिपूर्णता अशी केव्हाही असू शकणार नाही. जे जीवनात संपादावयाचे होते ते सर्व संपादिलेले आहे म्हणून आता कर्तव्य असे काही उरलेले नाही, अशा कृतकृत्य भावनेने रिक्तकाम किंवा पूर्णकाम झालेले धन्य पुरुष आपण होऊन आपले प्राण विसर्जन करतात. ते आपले नश्वर जीवन विश्वाच्या चिरंतन जीवनात विलीन करुन टाकतात.’

त्यांनी 1966 मध्ये प्राणांतिक उपोषण करुन आत्मार्पण करण्याचा निर्धार केला. त्यांनी 3 फेब्रुवारी 1966 या दिवशी हे उपोषण सुरु केले. ते 23 दिवस चालले. शेवटी 26 फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता, वयाच्या 83 व्या वर्षी सावरकरांनी आपला देह मृत्यूला अर्पण केला.

सावरकरांचा गौरव

सबंध भारतभरच्या नेत्यांनी, वृत्तपत्रांनी सावरकरांच्या मृत्यूची त्वरेने दखल घेतली आणि त्यांना गौरवपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सावरकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, प्रसंगी परदेशात राहून, तुरुंगात राहून, हाल-अपेष्टा सोसून जी जाज्वल्य पत्रकारिता केली, निर्भयपणे आपले विचार मांडले, समाजाला जागे करण्याचा सतत प्रयत्न केला यावरुनच त्यांचे निस्सिम राष्ट्रप्रेम आणि दूरदृष्टी दिसून येते.  आपल्या पत्रकारितेद्वारे त्यांनी मांडलेले विचार किती तंतोतंत खरे ठरत आहे, हे आजची जागतिक अशांततेची परिस्थिती पाहता आपणास पटतात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र आदरांजली...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा