विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उच्चशिक्षण संस्थेनं (UGC) आपल्या पूर्वीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. विद्यापीठांना सप्टेंबरपर्यंत विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन पर्यायांचा वापर करून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास सांगितलं. त्यानंतर मुंबई आणि राज्यातील इतर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. पण UGC च्या निर्णयाला युवा सेनेनं विरोध केला. आता युवा सेनेला विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर UGC च्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. #cancelfinalyearexam असा ट्रेंड ट्विटरवर सुरू करण्यात आला आहे. युवा सेने तर्फे ऑनलाईन याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या याचिके तर्फे परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी केली जात आहे. याच याचिकेला अनेक विद्यार्थ्यांनी पाठिंबा देत परीक्षा रद्द करण्यासंदर्भात ट्विट केलं आहे.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कम्युनिटी ट्रान्समिशनची भिती आहे. तर ऑनलाईन परीक्षेसाठी लोकांकडे चांगल्या इंटरनेटची सुविधा नाही.
युवा सेनेनं विरोध केल्यानंतर अनेक विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आहेत. छात्र भारतीनं विद्यार्थ्यांना सर्व परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. छात्र भारतीचं म्हणणं आहे की, जोपर्यंत मुंबई ग्रीन झोनमध्ये येत नाही आणि COVID 19 वर लस सापडत नाही तोपर्यंत परीक्षांवर बहिष्कारा टाकावा.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या संघटनेनं देखील या निर्णयाला विरोध केला आहे. मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी यांच्या ऑफिसच्या बाहेर संघटनेच्या काही विद्यार्थ्यांनी आपला विरोध दर्शवला. याशिवाय UGC ची गायडलाईन्सच्या प्रती फाडल्या.
फक्त ABVP या विद्यार्थी संघटनेनं UGC च्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यानुसार विद्यापीठाकडे सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे. त्यात ते परीक्षेचं योग्य नियोजन करतील.हेही वाचा