राज्य सरकारकडून अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी एचआरडीकडे धाव घेतली आहे.
याच मुद्द्यावर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. यासोबतच त्यांनी ऑनलाईन याचिका देखील दाखल केली आहे.
वरुण सरदेसाई यांनी ट्विटरवर ट्विट करत UGC च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सरदेसाई म्हणाले की, 'सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे लॉजिक काय?. सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार आहे की कोरोना संपणार आहे? परीक्षा घ्यायच्याच होत्या तर मग कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असतानाच घ्यायला हव्या होत्या भूमिकाही त्यांनी घेतली.
याशिवाय वरुण सरदेसाई यांनी कम्युनिटी ट्रान्समिशनची चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'यूजीसीनं सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतल्या, या परीक्षादरम्यान कम्युनिटी ट्रान्समिशन झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले, अंतिम वर्षाच्या लाखो विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळवली आहे. तर काहींनी खाजगी भारतीय विद्यापीठे किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. सप्टेंबरमधील परीक्षेचा अर्थ असा आहे की, यासर्व संधी विद्यार्थी प्रभावीपणे गमावतील.
आयआयटी मुंबई आणि भारतीय विद्यापीठांसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. मग आपण या परीक्षांच्या गरजेचा आग्रह का धरतोय? असा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.हेही वाचा