कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे विद्यापीठ परीक्षा खोळंबल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्रालयानं या परीक्षांना परवानगी दिली आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षा घेण्यात याव्यात, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
देशात आता अनलॉक दोनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यानुसार केंद्र सरकारकडून अनेक गोष्टांना परवानगी देण्यात येत आहे. आता केंद्र सरकारनं विद्यापीठ परीक्षांना परवानगी दिली आहे. पण यासाठी विद्यापीठांनी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचं आणि निश्चित केलेल्या परीक्षा प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करावं, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात विद्यापीठ परीक्षांना परवानगी देण्यात येत असल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.
यूजीसीकडून यासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण यूजीसीनं विद्यापीठ परीक्षांसाठी २९ एप्रिल २०२० ला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पण या परीक्षांसाठी विद्यापीठ आणि संस्थांना सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठांना आणि संस्थाना परीक्षा नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी लगबग करावी लागणार आहे.
उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या किंवा पदवीच्या परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अथवा दोन्ही पद्धतीचा उपयोग करून घ्याव्यात, असं यूजीसीनं जारी केलेल्या २९ एप्रिलच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय. तसंच प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षाच्या किंवा गेल्या सेमिस्टरच्या गुणांच्या पुढच्या वर्गात पाठवावे, असं यूजीसीनं म्हटलंय.
हेही वाचा