महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) च्या प्रवेश प्रक्रियेसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अपात्र ठरवल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत प्रवेश प्रक्रियेला आव्हान दिलं होतं. त्यानुसार बुधवारी न्यायालयाने एमपीएसीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
पुढील सुनावणीपर्यंत अर्थात १ फेब्रुवारीपर्यंत ही स्थगिती कायम राहणार असून न्यायालयाने राज्य सरकार पुढील सुनावणीपर्यंत यासंबंधी सविस्तर उत्तर देण्याचंही आदेश दिले आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अपात्र ठरवल्याप्रकरणी अजय मुंडे या विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने बुधवारी एमपीएसच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला खडसावत गुणवत्तेच्या आधारावर जर एखादा परिक्षार्थी खुल्या वर्गात अर्ज दाखल करत असेल, तर त्याला विरोध का? असा सवाल केला आहे. तर याआधीच उच्च न्यायालयाने गुणवत्तेच्या आधारावर खुल्या प्रवर्गात अर्ज करण्यासंबंधीचे आदेश दिले असून राज्य सरकार त्या आदेशांचं पालन का करत नाही? असं विचारत हा न्यायालयाचा अवमान असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं आहे.