Advertisement

शिक्षणात मानवी मुल्यांचा समावेश व्हावा- दलाई लामा

बौध्द धर्मातील मैत्री संकल्पनेवर प्रकाश टाकताना दलाई लामा म्हणाले की, मैत्री, करुणा आणि प्रेम भावना या मुळ तत्वांचा अंगीकार करुन अनेक मोठ्या समस्यांना उत्तर दिलं जाऊ शकते. जीवनात कोणत्याही समस्यांचे निराकरण हातात शस्त्रे घेऊन होऊ शकत नाही. कारण शस्त्रांमुळे जगाने मोठी किंमत मोजली आहे.

शिक्षणात मानवी मुल्यांचा समावेश व्हावा- दलाई लामा
SHARES

भारताला ज्ञानाची एक उज्वल परंपरा आहे. पूर्वीपासूनच भारतीय संस्कृतीमध्ये अहिंसा, करुणा ही मुल्ये अस्तित्वात असून शांतता आणि अहिंसेने अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते. त्यासाठी मानवी मुल्यांना ओळखणं गरजेचं असून या मानवी मुल्यांचा शिक्षण पद्धतीत समावेश व्हावा, असं मत जागतिक बौद्ध धर्म गुरू दलाई लामा यांनी व्यक्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द कन्सेप्ट ऑफ मैत्री (मेत्ता) इन बुद्धीजम’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते. 


संवाद मार्गाचा वापर

 बौध्द धर्मातील मैत्री संकल्पनेवर प्रकाश टाकताना दलाई लामा म्हणाले की, मैत्री, करुणा आणि प्रेम भावना या मुळ तत्वांचा अंगीकार करुन अनेक मोठ्या समस्यांना उत्तर दिलं जाऊ शकते. जीवनात कोणत्याही समस्यांचे निराकरण हातात शस्त्रे घेऊन होऊ शकत नाही. कारण शस्त्रांमुळे जगाने मोठी किंमत मोजली आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद मार्गाचाही वापर करणे तितकेच महत्वाचे आहे, कारण विसंवादाने प्रश्नांची उकल होणं सध्या कठीण होत आहे. 


करुणेमुळे क्रोधावर मात 

सध्या २१ व्या शतकात लोकांना शांती हवी असून अनेक लोक हिंसेला कंटाळली आहेत. त्यामुळे आपण एकमेकांचा आदर ठेऊन एकात्मतेची भावना अंगी बाळगून या पद्धतीच्या आंतरमुल्यांचा अंतर्भाव आपल्या शिक्षणात कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.  इतकचं नव्हे तर मानवी मुल्यांवर आधारित भारतीय तत्वज्ञानाची जगाला ओळख करुन देण्याची गरज असून आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय मानवी मुल्यांची सांगड घालणेही तितकेच गरजेचं आहे.  विशेष म्हणजे अहिंसा आणि करुणेमुळे क्रोधावर सहजरित्या मात करता येते अस मत त्यांनी मांडलं. 


धर्माच्या नावावर विभागणी 

एकोप्यासाठी म्हणून धर्माकडे पाहणे गरजेचे असून धर्माच्या नावावर विभागणी होणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय राग, क्रोध आपल्या सुखी असणाऱ्या भावनेला नष्ट करतात. त्यामुळे राग क्रोध बाजूला ठेवून आपण प्रेम भावनेने वागायला शिकलं पाहिजे व शत्रूलाही प्रेमभावनेनं सामोरे गेले पाहिजे असंही जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी सांगितले. 


जर्नलचे प्रकाशन

मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'फिलॉसॉफिकल ट्रॅडिशन ऑफ द वर्ल्ड’ या जर्नलचे प्रकाशन जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. सुनिल भिरुड, तत्वज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. गीता रमणा, प्राध्यापक डॉ. अर्चना मलिक,आयोजन समितीचे सदस्य प्राध्यापक डॉ. संदेश वाघ उपस्थित होते.



हेही वाचा -

मुंबई विद्यापीठ - काॅमनवेल्थ ऑफ पेन्सिलव्हेनियामध्ये शैक्षणिक भागीदारी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा