केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल सोमवार ६ मे रोजी ऑनलाइन पद्धतीनं नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल ९१.१ टक्के लागला असून नोएडाचा सिद्धांत पेनगोरीया यानं पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत.
यंदा, इयत्ता १० वीमध्ये एकूण १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर, २४ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९८ गुण मिळवले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेला जवळपास १८ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
विद्यार्थी सीबीएसईची अधिकृत वेबसाइट results.nic.in, cbseresults.nic.in और cbse.nic.in वर आपला निकाल पाहू शकतात. या व्यतिरिक्त विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट अॅप- एसएमएस ऑर्गनायझरद्वारेही निकाल पाहू शकतात. यासाठी त्यांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळेचा कोड रजिस्टर करावा लागणार आहे.
सीबीएसईनं सरप्राइज देत १२ वीचे निकाल जाहीर केले. त्याचप्रमाणं इयत्ता १० वीचे निकाल जाहीर करत विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सरप्राइझ दिलं आहे. गेल्या वर्षी निकालानंतर ४ विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले होते.
यंदा नवी मुंबई आणि ठाण्याच्या दोन विद्यार्थ्यांनी सीबीएसई परीक्षेत बाजी मारली आहे. नवी मुंबईतील दिपसना पांडा हिला ४९७ मार्क मिळाले आहेत. तसंच, ठाण्यातील अद्री दास आणि धात्री कुशल मेहता या विद्यार्थ्यांना ४९७ मार्क मिळाले आहेत.
हेही वाचा -
वैद्यकीय शिक्षणात आरक्षण न मिळाल्यानं मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन
पालघर स्थानकातील रेल्वे पोलिसांची ड्युटी ८ तास