केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने देशभरात घेतलेल्या १०वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेमध्ये गुरगावच्या प्रखर मित्तलने बाजी मारली असून त्याने ५०० पैकी ४९९ गुण मिळवले आहेत. एकूण ४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला असून चारही जणांना ४९९ मार्क मिळाले आहेत. यावर्षी जवळपास १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
यंदा पहिल्यांदाच ४ विद्यार्थ्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या चारही विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुणांची कमाई केली आहे. यामध्ये गुडगावचा प्रखर मित्तल, शामलीची नंदिनी गर्ग, कोचीनची श्रीलक्ष्मी आणि बिजनौरची रिमझिम अगरवाल यांचा समावेश आहे. देशात टॉप केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
या परीक्षेमध्ये देशभरात ८६.७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, यामध्ये तिरूअनंतपुरममध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तिरूअनंतपुरममध्ये ९९.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिव्यांगांच्या श्रेणीमध्ये गुडगावच्या अनुष्का पांडाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
cbse.nic.in, cbseresults.nic.in, results.nic.in, Microsoft SMS Organizer, www.google.com, www.bing.com या वेबसाईट्सवर आणि UMANG या मोबाईल अॅप्लिकेशनवर तुम्हाला निकाल पहाता येणार आहेत. निकाल पहाण्यासाठी तुम्हाला तुमचे परीक्षा प्रवेशपत्र अर्थात हॉलतिकीट सोबत ठेवावं लागणार आहे. त्यातली माहिती वेबसाईट आणि अॅप्लिकेशनवर भरल्यानंतरच निकाल पहाता येणार आहेत.
दहावीच्या सीबीएसई परीक्षेकरिता देशभरातून १६ लाख ३८ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. याशिवाय मेसेजद्वारेही तुम्हाला निकाल पाहता येईल. दहावीच्या निकालासाठी मेसेज बॉक्समध्ये जा. तिथे cbse10 स्पेस rollno स्पेस sch no स्पेस center no स्पेस लिहा आणि ७७३८२९९८९९ या नंबरवर पाठवा.
याआधी सीबीएसईने २६ मे रोजी १२वीचे निकाल जाहीर केले होते. यावर्षी सीबीएसईच्या परीक्षांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. १०वी आणि १२वीचे अनुक्रमे गणित आणि अर्थशास्त्र हे पेपर लीक झाल्यामुळे काही भागांमध्ये पुन्हा परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या परीक्षांचे निकाल वेळेवर लागणार की नाही? याविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, सीबीएसईने वेळेवर निकाल जाहीर करून सर्वच विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे.
नुकतेच सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये गाझियाबादच्या मेघना श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक पटकावला होता. मेघनाला ५०० पैकी ४९९ मार्क्स मिळाले होते.
हेही वाचा-
फाकेहाला परीक्षेची परवानगी नाहीच