दहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तकं उपलब्ध करून देताना सत्ताधारी पक्षाने कुठलंही तारतम्य न बाळगता इथंही राजकारणाचा डाव खेळला आहे. तो अशा पद्धतीने की, राज्यशास्त्राच्या पुस्तकात भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेनेचं गुणगान करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर काँग्रेसने उच्च न्यायालयात दाद मागण्याचं ठरवल्याचं कळत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकं छापण्यात आली आहेत. बालभारतीद्वारे या पुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. या नवीन पुस्तकांचं प्रकाशनही नुकतंच दादरमध्ये करण्यात आलं. नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यशास्त्र हा विषय इतिहासाच्या पुस्तकात सामाविष्ट करण्यात आला आहे. त्यात सध्याची राजकीय परिस्थिती तसंच राजकीय पक्ष याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष प्राचीन भारतीय संस्कृती व परंपरा जतन करणारा असून या पक्षाने आर्थिक सुधारणांवर भर दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
शिवाय 'चीन की सोव्हिएत युनियन यापैकी कुणाचं नेतृत्व स्वीकारायचं? यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये वाद झाले होते. त्यातूनच भारतीय कम्युनिस्ट पक्षा (मार्क्सवादी) ची स्थापन झाली, अशी माहितीही राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात देण्यात आली आहे. या पुस्तकात काही प्रादेशिक पक्षांची माहिती तसंच राज्यातील सध्याचं राजकरण याची माहितीही देण्यात आली आहे
राजकारणातील घराणेशाही ही भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. राजकारणात एकाच कुटुंबाची मक्तेदारी निर्माण झाल्याने लोकशाही संकुचित होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होत येत नाही. असे काही प्रश्नही विद्यार्थ्यांना पुस्तकात विचारण्यात आले आहेत.
त्याचबरोबर लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्ता मिळवतात. परंतु, राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत निवडणुका होतात का? राजकीय पक्षांनी अंतर्गत निवडणुका घेणं आवश्यक असतं. परंतु सध्याच्या स्थितीत अशाप्रकारच्या निवडणुका होतात का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विचारणा करण्यात आलेल्या या प्रश्नांमुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो.
एवढंच नाही, तर शिवसेना हा देखील राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष असून त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचं संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी झाली असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हाचीही भगव्या रंगात छपाई करण्यात आली आहे. शिवसेना १९९५ साली भारतीय जनता पार्टीसोबत युती करून सर्वप्रथम सत्तेत आला असून २०१४ च्या निवडणूकीनंतरही महाराष्ट्रात भाजपसोबत सहभागी झाला, असंही या पुस्तकात म्हटलं आहे.
हेही वाचा-
नववी नापासांसाठी खुशखबर! फेरपरीक्षेची मिळणार संधी!
दहावीच्या पुस्तकात अवयवदानाचाही समावेश