अकरावी प्रवेशाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी रोजी जाहीर होणार आहे. दुसऱ्या यादीत मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेले ४१ हजार ७१८ विद्यार्थ्यांसह आतापर्यंत एकदाही गुणवत्ता यादीत नाव न आलेल्या विद्यार्थ्यांचं लक्ष आता या यादीकडं लागलं आहे. मात्र, पहिल्या व दुसऱ्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळून देखील प्रवेश न घेतलेल्या १६ हजार ३४४ विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळणार नाही.
तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २, ३ आणि ५ ऑगस्ट रोजी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीनंतर अकरावी ऑनलाइनच्या नियमित प्रवेशफेऱ्या संपणार असून प्राचाऱ्यांना कॉलेज सुरू करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयानं दिल्या आहेत. पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळणार आहे.
शेवटच्या यादीसाठी एकूण १ लाख ८ हजार जागा शिल्लक आहेत. यातील आर्टस् शाखेच्या १४ हजार २६०, कॉमर्सच्या ५५ हजार ७०१, सायन्सच्या ३५ हजार ६७४ आणि एचसीव्हीसीच्या २ हजार ५८२ जागा आहेत. अकरावी प्रवेशाच्या तीनही प्रवेशफेऱ्यांनंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील आणि तिसऱ्या यादीचा कटऑफ ५ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे. या रिक्त जागांनुसार विशेष गुणवत्ता फेरी राबविली जाणार आहे. विशेष फेरीनंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी’ राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा -
मुंबईत जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद
विद्यार्थी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर, ३० ऑगस्ट रोजी निवडणूक