हो नाही करता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची (SSC) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी केली. राज्यातील कोरोना संक्रमणाच्या बिघडत चाललेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यासंदर्भात अधिक माहिती देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत १२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय इतर शिक्षण मंडळांना कळविण्यात आला होता. तसंच त्यांना देखील आपापला निर्णय घेण्यास सांगितलं होतं. त्यानुसार राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) तसंच आयसीएसई बोर्डाने देखील दहावीची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळाची देखील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
हेही वाचा- दहावीच्या परीक्षांबाबत अजूनही गोंधळ का?, भाजपचा शिक्षणमंत्र्यांना प्रश्न
Given the worsening situation of the #Covid-19 pandemic, the Maharashtra government has now decided to CANCEL the state board exams for class 10th. The health & safety of our students and teachers is our topmost priority.#exams #ssc #hsc pic.twitter.com/C8xCY3VVdX
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 20, 2021
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देताना शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला असून दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येईल. निकाल कसा तयार करायचा याबाबतचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील. दहावीचे जे विद्यार्थी त्यांच्या गुणांबाबत समाधानी नसतील, त्यांना गुण सुधारण्याची संधी दिली जाईल. यासंबंधी कशा पद्धतीने परीक्षा आयोजित करता येतील, त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय जाहीर केला जाईल, असंही वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी सांगितलं.
बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाची असते, त्यामुळे बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून त्यानुसारच निर्णय घेण्यात येईल, असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
याआधी दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.
(maharashtra education board cancelled ssc 10th exam due to covid 19 pandemic)