महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १०वीची परीक्षा २९ एप्रिल, तर १२वीची २३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्यानं ऑफलाइन होणाऱ्या या परीक्षांच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार असून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्याक्षिक परीक्षेऐवजी अंतर्गत मूल्यमापन होणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून नव्या नियमांबाबतची माहिती दिली. कोविडची परिस्थिती पाहता यावर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेणे कठीण असल्याने विद्यार्थ्यांना सवलत देणे गरजेचे आहे.
Hats off to our students who have braved this tough academic year. To help them, here are some concessions and guidelines for the final exams. For FAQs, referhttps://t.co/KX9sqYrmnj pic.twitter.com/BX0873EFVM
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 20, 2021
त्यामुळे दहावीच्या विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांऐवजी विद्यार्थ्यांना अंतर्गत असाईनमेंट देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. अंतर्गत मूल्यमापन लेखी परीक्षेच्यानंतर(२१ मे ते १० जून) दरम्यान सबमिट करावे लागणार आहेत.
हे नियोजन संबंधित शाळेकडून करण्यात येणार आहे. या दरम्यान विद्यार्थी आजारी असल्यास १५ दिवसांची वाढीव वेळ सबमिशनसाठी देण्यात येणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्यादृष्टीने बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा महत्त्वाच्या आहेत. या परीक्षा रद्द करण्यात आल्या नाहीत. मात्र, प्रात्यक्षिक प्रयोगांची संख्या या वर्षासाठी पाच ते सहा इतकीच करण्यात आली आहे.
प्रात्यक्षिक वही (जर्नल) लेखी परीक्षेनंतर (२२ मे ते १० जून) सादर करता येतील. या परीक्षेसाठी अंतर्गत व बहिस्थ परीक्षक संबंधित महाविद्यालयातून देण्यात येतील. प्रात्यक्षिक वही, परीक्षा टप्प्याटप्प्याने (बॅचेसनुसार) होतील. या दरम्यान सुरक्षितेचे सर्व नियम पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षा अथवा प्रात्यक्षिक वही सादर करण्याच्या दरम्यान एखादा विद्यार्थी आजारी असल्यास त्याला १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
या वर्षी विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन परीक्षेची वेळ वाढवण्यात आली आहे. ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे, तर ४०-५० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी १५ मिनिटे अधिक वेळ देण्यात येणार आहे.
कोविड संसर्गबाधित विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या विशेष परीक्षेसाठी कोणतेही अतिरीक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, ही परीक्षा काही निवडक परीक्षा केंद्रावर होणार असून परीक्षा कालावधीदेखील कमी दिवसांचा असणार आहे.
या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. कोविडच्या नियमांचे पालन करायचे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी किमान एक तास आधीच परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका १० मिनिटे आधीच देण्यात येणार आहे.
हेही वाचा