शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील तीन शिक्षकांना नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३५० हून अधिक शिक्षकांना दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते.
या पुरस्कार विजेत्यांमध्ये महापालिकेच्या प्रभादेवीतील मराठी शाळा क्र. २ येथील सहायक शिक्षिका तृप्ती हातिस्कर यांचा समावेश आहे. स्वत: अत्यंत कमी वयात शाळा सोडल्यानंतरही त्यांनी तब्बल ३२ वर्षे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लहान बहिणभावंडाची देखभाल करण्यासाठी मी पाचवीतच शिक्षण सोडले. तेव्हा माझ्याच वयाच्या इतर मुलांना शाळेचा गणवेश घालून जाताना पाहून मी निराश व्हायचे. परंतु तीन वर्षांनी माझ्या आई-वडिलांनी मला रात्र शाळेत जाण्यास परवानगी दिली. हा अनुभव मला बरेच काही शिकवून गेला. माझ्याप्रमाणे इतर कुठल्याही मुलाला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशानेच मी सतत कार्यरत राहिले. माझ्या कार्यात माझे कुटुंब, शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, पालिका अधिकाऱ्यांचा मोलाचा पाठिंबा मिळाला, असे हातिस्कर यांनी सांगितले. हातिस्कर आपल्या मुलीसोबत पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीत आहेत.
शहरातील दुसरा पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे, नागाेरा तायडे (५१). तायडे घाटकोपरमधील महापालिकेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. २ मध्ये २७ वर्षांपासून सहायक शिक्षक आहेत. तायडे पालघरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यास वर्ग चालवतात.
महापालिकेच्या शाळेत असूनही येथील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहे. आपण औद्योगिकीकरणाला स्वीकारले आहे. त्यासाठी भलेही आपल्याला पुन्हा पायापासून सुरूवात करावी लागणार असली, तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हे खूपच चांगले असल्याचे तायडे म्हणाले.
तीसरा पुरस्कार मिळविणाऱ्या काकना चंद्र (४८) अणूशक्ती नगरमधील अणूऊर्जा केंद्र शाळा क्र. २ मध्ये गणित विषय शिकवतात. त्या म्हणाल्या, सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून त्याच्यातील आत्मविश्वासाला बळ मिळेल. शिक्षण मजेदार होण्यासाठी त्यात रचनात्मक बदलाची आवश्यकता आहे.
चंद्र यांनी १९९२ पासून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील बदलाचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले.
या सर्व शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते ५० हजार रुपये आणि शाल देऊन गौरविण्यात येईल.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)