विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थीकेंद्रित आणि सर्वसमावेशक असा २०१९-२० सालचा ६९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरूवारच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. २०१९-२० या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. या प्राधान्यक्रमात विद्यार्थी भवन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत, तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी वसाहत, संग्रहालय कॉम्प्लेक्स इमारत, १०० क्षमतेचं अतिथीगृह आणि ५०० क्षमतेचं मुलींचं वसतिगृह अशा नियोजित बांधकामांचा समावेश आहे.
२०१९-२०२० चा ६९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प डॉ. अजय भामरे, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि वित्त व लेखा अधिकारी संजय शहा यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्या उपस्थितीत अधिसभेच्या मान्यवर सदस्यांसमोर सादर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत या वर्षीचा हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. तसंच, या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ६८.८१ कोटींची तूट दाखविण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी विद्यापीठाला एकूण ११ लाखांची देणगी प्राप्त झाली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विद्यापीठाने नावीन्यपूर्ण उपक्रम आणि योजनांसाठी भरघोस तरतूद केली आहे. यामध्ये संशोधनवृत्तीला चालना देऊन संशोधन संस्कृती रुजविण्यासाठी संशोधन करून प्रकाशनासाठीचा पुरस्कार, संशोधनासाठी नवीन उपक्रम राबविण्यासाठी नेतृत्व करणं, संशोधनासंदर्भात सल्लामसलत, पुस्तक प्रकाशन, उत्कृष्ठ संशोधन, नवीन संशोधकांना प्रोत्साहन, एम.फीलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, व्हाईस चान्सलर फेलोज, इन्क्युबेशन सेंटर, महिलांसाठी कल्याणकारी योजना, जगातील उत्कृष्ट १०० विद्यापीठांत समाविष्ट होण्याची उद्दिष्ट्ये, आंतरराष्ट्रीय सहभाग कक्ष, इतर विद्यापीठातील उत्कृष्ट कामाचा अभ्यास करण्यासाठी शिक्षक, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा सदस्य यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा, विद्यापीठ कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, संशोधनात्मक काम करणारे शिक्षक आणि अधिसभा सदस्यांना पारितोषिकं, सहयोगी प्राध्यापक आणि प्रा. बाळ आपटे अध्यासन केंद्र, विद्यार्थी विकास, संशोधन, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरक्षण, वित्तीय स्वयंपूर्तता आणि पारितोषिकं अशा अनेक बाबींवर भर देण्यात आला आहे.
हेही वाचा -
'राज ठाकरेंनी २० वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करु नये’ - किरीट सोमय्या
धारावीत घराचा भाग कोसळून ८ जण जखमी