मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील गरवारे करिअर एज्युकेशन संस्थेने कचऱ्यापासून खतनिर्मितीच्या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशनला अनुसरून आणि महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई या अभियानाला जोड म्हणून हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
गरवारे संस्थेतील कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि शाश्वत विकास तसंच पर्यावरण व्यवस्थापन या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. २५ मे, २०१८ पासून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पातंर्गत टाकाऊपासून खतनिर्मिती करून पर्यावरणाला पुरक आणि कॅम्पसमध्ये पोषक वातावरण निर्माण केलं जाणार आहे. अशाप्रकारे टाकाऊपासून खतनिर्मिती करणारी ही पहिलीच संस्था आहे.
गरवारे संस्थेतील उपहारगृहातून दिवसाला साधारणतः २० ते ३० किलोग्रॅम ओला तर उद्यानातील सुमारे ५ किलोग्रॅम सुका कचरा निघतो. दरम्यान यामुळे कचऱ्याची नुसती विल्हेवाट न लावता त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकलेली खतनिर्मितीची प्रक्रिया मुलांमार्फत सत्यात उतरवली जाणार आहे.
येत्या वीस ते पंचवीस दिवसात हे खत तयार करण्यात येणार असून भविष्यात या प्रकल्पाला मोठं रुप दिलं जाणार असून खतविक्रीतून महसूल गोळा केलं जाणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पामुळे स्वच्छ आणि सुंदर कॅम्पस ही कल्पना सत्यात उतरणार.
- डॉ. मेधा तापियावाला, प्रभारी संचालिका, गरवारे संस्था