मुंबई विद्यापीठाने अखेर ४७७ निकाल जाहीर केले खरे, मात्र अद्याप दीड हजार उत्तरपत्रिकांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे काही निकालांना विलंब होत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत होते. ज्या विद्यर्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्यांना सरासरी गुण देण्यात येतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
हरवलेल्या उत्तरपत्रिकांचा शोध घेतला जाईल, तसेच त्या विद्यार्थांच्या सरासरी गुणांचा निर्णय सध्या तरी घेतला जाणार नाही, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हरवलेल्या उत्तरपत्रिकांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना उत्तरपत्रिकांच्या पानांची सरळमिसळ झाली. या उत्तरपत्रिका हरवल्या नाहीत. आतापर्यंत ५०० उत्तरपत्रिका शोधण्यात विद्यापीठाला यश आले आहे. उर्वरीत १५०० उत्तरपत्रिकांचा शोध सुरू आहे. उत्तरपत्रिका ठेवताना चुकीच्या गठ्ठ्यात ठेवल्या गेल्यामुळे हा गोंधळ झाला, असा खुलासा विद्यापीठाने केला आहे.
विद्यार्थ्यांच्या चुकीमुळेच उत्तरपत्रिका सापडत नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांवर चुकीचे आसन क्रमांक लिहिले आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज कोड चुकीचा लिहिल्यामुळे उत्तरपत्रिका शोधायला वेळ लागत आहे, असे म्हणत विद्यापीठाने उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे खापर विद्यार्थ्यांवरच फोडले.
त्या १५०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण द्यावेत, असा विचार सध्या तरी नाही. उत्तरपत्रिका शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तरपत्रिका शोधायला आणखी वेळ लागेल. पण त्या गहाळ झालेल्या नाहीत. त्यामुळे अद्याप तरी सरासरी गुण द्यावेत, असा विचार झालेला नाही.
अजुर्न घाटुळे, प्रभारी परीक्षा नियंत्रक
हेही वाचा -
मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल जाहीर
कुलगुरूंना बडतर्फ करा! शिक्षक संघटनांची मागणी