महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या एचएससी (बारावी) बोर्डाच्या परीक्षेेचे अर्ज भरण्यास १ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. यंदा पहिल्यांदा 'सरल' पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरले जाणार असून २१ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहेत.
राज्यातून दरवर्षी साधारण १५ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करतात. त्यानुसार यंदाही बारावीच्या नियमित, पुर्नपरीक्षार्थी, श्रेणीसुधार अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाही फेब्रुवारी-मार्च दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.
यंदा प्रथमच 'सरल' या डेटाबेसवरून विद्यार्थ्यांना अर्ज करायचे असून मॅनेजमेंट किंवा इतर अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित पद्धतीनं नोंद करावी लागणार आहे. त्याशिवाय २१ ऑक्टोबरनंतर विद्यार्थ्यांना विलंब शुल्क द्यावे लागणार असून याची मुदत फक्त ३१ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. बारावीचे हे अर्ज करताना 'सरल' डेटामध्ये या विद्यार्थ्यांची आधीपासून नोंद असणं मात्र आवश्यक असणार आहे.
यंदा बारावीचे अर्ज हे 'सरल' नोंदणीनुसार होणार असल्यानं अकरावीत ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नोंद करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसचं 'सरल' पद्धतीनं नोंदणीनुसार जे प्रवेश छुप्या पद्धतीनं झाले आहेत त्यांची ऑफलाईन नोंदणी नसल्यानं असे प्रवेश या निमित्तानं बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा-
'लॉ'च्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश, अनेक विद्यार्थी चिंताग्रस्त
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी जागा अधिक विद्यार्थी कमी