अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता याद्या जाहीर होऊनसुद्धा हजारो विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळ या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबावन्यत येणार आहे. या फेरीसाठी कोट्यातील जागा जमा झाल्यामुळे तब्बल ९५ हजार जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्याला पसंतीक्रम देण्यासाठी मंगळवारी १४ ऑगस्ट हा शेवटचा दिवस असणार आहे. तसंच येत्या १८ ऑगस्टला पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
मुंबईतील बहुतांश कॉलेजांतील अल्पसंख्याक कोट्यातील जागा जमा न झाल्यानं तिसरी आणि चौथी यादीही ८० ते ९० टक्केदरम्यान बंद झाली. त्यामुळे तेच कॉलेज हवे म्हणून पसंतीक्रम न बदललेल्या आणि ८० ते ९० टक्क्यांच्या आसपास गुण असलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. त्यांना या विशेष फेरीत प्रवेश दिला जाणार आहे. या फेरीसाठीच्या रिक्त जागांची कॉलेजनिहाय यादी अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या चार यादीत जमा न झालेल्या मुंबई विभागातील अल्पसंख्याक कोट्यातील ५० हजारहून अधिक जागा या विशेष फेरीसाठी जमा झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रवेशच्या प्रतीक्षेत असलेल्या ८० ते ८५ गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अनेक नामवंत कॉलेजांत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. या फेरीसाठी खुल्या वर्गात तब्बल ९३ हजार ३२१ जागा आहेत, तर इतर आरक्षणानिहाय मिळून तब्बल ९५ हजार ४२४ जागा उपलब्ध झाल्या आहेत.