Advertisement

जात वैधता प्रमाणपत्राशिवाय होणार प्रवेश प्रक्रिया


जात वैधता प्रमाणपत्राशिवाय होणार प्रवेश प्रक्रिया
SHARES

 सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मात्र, प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे.


राज्यपालांची मान्यता

या वर्षीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. परंतु, जात प्रमाणपत्र वैधता तपासणी समितीकडे मोठ्या प्रमाणात पडताळणी अर्ज प्रलंबित आहेत.  यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळणं शक्य होणार नाही.

यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (२००१ चा महा.२३), यात सुधारणा करण्यासाठी राज्यपालांना विनंती केली होती. त्यानुसार राज्यपालांनी  या सुधारणेसाठी मान्यता दिली आहे.


तात्पुरता प्रवेश रद्द

विद्यार्थ्यांना जात पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला असल्याचा पुरावा सादर करून त्या आधारे, प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाविद्यालयात प्रवेश घेताना या विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करणं अत्यावश्यक आहे. जर वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्याचा राखीव प्रवर्गातून मिळवलेला तात्पुरता प्रवेश रद्द होणार आहे. ही तरतूद फक्त सन २०१८-१९ या वर्षांसाठीच्या प्रवेशासाठी लागू राहणार आहे.



हेही वाचा -

सोमवारी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी

इंग्रजी शिकताय मग 'हे' कराच



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा