'काय भुललासी वरलीया रंगा...' हे संत चोखामेळा यांनी लिहिलेल्या अभंगातील या ओळी १०० टक्के खऱ्या असल्याची प्रचिती बऱ्याचदा येते. मनात चीड आणणारा खलनायक साकारणाऱ्या कलाकाराचं जेव्हा खरं रूप दिसतं, तेव्हा वरील संतवचनांची आठवण होतेच.
संतांनी म्हटल्याप्रमाणं एखाद्याचं बाह्य रूप वेगळं असलं तरी त्याचं अंतर्मन किती शुद्ध आहे यावर त्याचा चांगुलपणा ठरवला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळापासून खलनायक साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचंही असंच एक रूप एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. त्यांच्यातील सुहृदयी माणूस दाखवणारा हा व्हिडीओ 'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांसाठी नक्की पहावा...
I was delighted to meet my morning walk friends Rahul, Divya, yogesh & Sakshi. Felt great. They have all passed in their respective school exams. So proud of them. Their love & warmth makes my world a wonderful place to be in.🙏😍 #StreetsOfMumbai #InspirationalChildren pic.twitter.com/8oQfQcXplp
— Anupam Kher (@AnupamPKher) 22 April 2019
खेर यांनी स्वत: शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये ते मॅार्निंग वॅाक करत असताना रस्त्यावरील काही गरीब मुलं त्यांना पाहून रस्त्यापलीकडून धावत येतात. त्यांच्यासोबत त्यांच्या आईसुद्धा असतात. आपल्याच घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीसोबत संवाद साधावा तशी ही मुलं अगदी सहजपणं खेर यांना अंकल म्हणत त्यांच्याशी बोलतात. खेर त्यांच्यातील इतर मुलं दिसत नसल्याची चौकशीही करतात. ही मुलं खेर यांच्याकडं आपल्याला बॅग न मिळाल्याची तक्रारही हक्कानं करतात. हे सर्व पाहिल्यावर खेर या मुलांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत असावेत आणि कदाचित तेव्हापासूनच त्यांच्या शिक्षणासाठीही खर्च करत असावेत याची जाणीव होते.
खेर यांच्या छत्रछायेखाली शिक्षण घेणाऱ्या राहुल, दिव्या, योगेश आणि साक्षी या गरीब मुलांपैकी कुणी नववी उत्तीर्ण झालं, तर कुणी दुसरी... कुणी पाचवी, तर कुणी सहावीत गेलं आहे. सर्व मुलं पास झाल्यानं खेर मुलांकडं गंमतीनं मिठाई मागतात. अर्थात त्यांच्याकडं मिठाई कुठून येणार हे खेर यांना ठाऊक होतं. म्हणूनच ते सर्वांचा एक फोटो घेतात आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. एखादा कलाकार कशाप्रकारे अगदी बेमालूपणं समाजकार्य करत गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलत असतो हे या व्हिडीओत पहायला मिळतं.
हेही वाचा -
आनंदा कारेकर शिकला ईस्ट इंडियन मराठी भाषा!