अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता सिमी सिद्धीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि मनसे कार्यकर्त्यांविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी लेखी तक्रार नोंदवली. २००८ मध्ये 'हाॅर्न ओके प्लिज' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नानाने इतर आरोपींच्या मदतीने गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने आपल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसून पोलिस या प्रकरणाची पडताळणी करत आहेत.
'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील एका गाण्याच्या शुटिंगवेळी नाना यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने तब्बल १० वर्षांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यानंतर दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत गेलं. चित्रपटसृष्टीत देखील या प्रकरणामुळे खळबळ उडाली. नाना पाटेकर चित्रीकरणानिमित्ताने मुंबईबाहेर असल्याने त्यांनी या आरोपांना कोणतंही उत्तर न देता तनुश्रीला वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे.
मुंबईत आल्यानंतर त्यांनी आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी माहिती देऊ असं नाना यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. तोपर्यंत दुसरीकडे तनुश्रीने ओशिवरा पोलिस ठाण्यात नाना आणि इतर आरोपींविरोधात तक्रार नोंदवत, सर्व आरोपींवर विनयभंग आणि धमकवण्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिस त्यावेळी घटनास्थळी उपस्थीत व्यक्तींचा पोलिस जबाब नोंदवणार आहेत.
हेही वाचा-
नाना पाटेकर -तनुश्री दत्ता वाद : राखी सावंतला धमक्यांचे फोन
नाहीतर, बिग बाॅस बंद पाडू- अमेय खोपकर