नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात महेश मांजरेकर दिग्दर्शित 'भाई - व्यक्ती की वल्ली' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण गतवर्षाच्या शेवटच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'सिंबा' चित्रपटाने पु. ल. देशपांडेंच्या जीवनावर आधारित असलेल्या 'भाई'ची वाट अडवल्याने मराठी चित्रपटाला शो मिळत नसल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
आजवर मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना सावत्र वागणूक मिळायची, पण सिंगल थिएटर्सनाही मराठीचं वावडं असल्याचं निदर्शनास आलं आहे. मुंबईतील काही थिएटर्ससह पुण्यातही 'भाई'ला एकही शो न दिल्याने वातावरण काहीसं तापलं होतं. पण पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इशारा दिल्यावर खळ्ळ खट्याक होण्याआधीच एकेरी सिनेमागृहांनी 'भाई'चा मार्ग मोकळा केला आणि हे प्रकरण शांततेत निकालात निघालं.
या सर्व प्रकरणावर मुंबई लाइव्हशी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, मुंबई-पुण्यासारख्या मराठमोळ्या शहरांमध्ये मराठी सिनेमाला एकही शो मिळत नाही याचं खूप वाईट वाटतं. 'सिंबा' खूप चांगला बिझनेस करतोय याबाबत दुमत नाही. पण त्या चित्रपटाला तीन शो द्या ना. मराठीला निदान एक शो तरी द्यायला काय हरकत आहे. काही ठिकाणी 'सिंबा'चे शो पाहायलाही विशेष गर्दी नाही. तरीही 'भाई'ला शो दिले जाऊ नयेत हे वाईट असल्याचं मत मांजरेकरांनी व्यक्त केलं आहे.
'भाई - व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या साहित्यीक पु. ल. देशपांडे यांचा जीवनप्रवास मांडणारा आहे. हा चित्रपट पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांमध्ये विभागण्यात आला आहे. पूर्वार्धाचा ट्रेलर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. प्रदर्शनानंतर प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांनी 'भाई'ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. शुक्रवारपूर्वीच एकेरी चित्रपटगृहांसोबतचा वाद मिटल्याने हे प्रकरण थोडक्यात निभावलं आहे.
हेही वाचा -
राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'धप्पा'चं 'मिशन झॅप झॅप'?
विसुभाऊंच्या 'कुटुंबाची' त्रिसहस्री वाटचाल!