वांद्रे - बॉलवुडची क्वीन म्हणजेच कंगना राणौतच्या शत्रूंच्या यादीत वाढ होत आहे. स्पष्ट आणि बिनधास्त बोलण्यामुळे कंगनाचे इंडस्ट्रीत मित्र कमी आणि शत्रू जास्त अशी अवस्था झालीय. आता कंगनाने खुद्द करण जोहरशी पंगा घेतला आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये कंगनाने घरणेशाही संदर्भात करणवर काही आरोप केले होते. तिच्या या उत्तरालाच करणने प्रत्युत्तर दिले आहे.
"प्रत्येकवेळी स्वतःचा बळी गेल्याचे दाखवण्याच्या कंगनाच्या स्वभावाची आता सवय झाली आहे. या इंडस्ट्रीमुळे तिला जर एवढाच त्रास होत असेल, अडचणी येत असतील तर तिने ही इंडस्ट्री सोडावी," असे करणने म्हटले. तसेच कंगनाच्या घराणेशाहीच्या आरोपालाही त्याने सडेतोड उत्तर दिले. "मी आत्तापर्यंत माझ्या कुटुंबातील कोणालाही चित्रपटसृष्टीत ब्रेक वगैरे दिलेला नाही. त्यामुळे माझ्यावर 'नेपोटिझम'चा आरोप करणाऱ्या कंगनाला त्या शब्दाचा खरा अर्थ माहीत नसावा," असेही करणने म्हटले. तसेच "माझ्या शोमध्ये ती पाहुणी म्हणून आली होती. त्यामुळे मी तेव्हा तिला काही बोलणे हे योग्य नव्हते. मत मांडण्याचा तिलाही अधिकार आहे. पण आता या मंचावरून मी माझं मत मांडत आहे," असेही करणने स्पष्ट केले.