काही दिग्दर्शक केवळ मसालापट आणि फँटसीपटांच्या प्रेमात असतात, पण काही मात्र कायम वास्तववादी चित्रपटांना प्राधान्य देतात. अशांपैकीच एक असलेले दिग्दर्शक मधुर भांडारकर आता 'बॉलिवूड वाइव्स' नावाचा चित्रपट बनवणार असल्याची चर्चा आहे.
मधुरनं आजवर नेहमीच वास्तववादी चित्रपट बनवले आहेत. 'त्रिशक्ती' आणि 'चांदनी बार'पासून सुरू झालेला हा मधुर प्रवास 'इंदू सरकार'पर्यंत येऊन पोहोचला आहे. या प्रवासात मधुरनं 'फॅशन', 'हिरोईन', 'पेज ३', 'ट्रॅफिक सिग्नल' असे वास्तववादी चित्र रेखाटणारे चित्रपट बनवले आहेत. २०१७मध्ये मधुरचा 'इंदू सरकार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, पण या चित्रपटाला बॅाक्स आॅफिसवर अपेक्षेप्रमाणं यश मिळालं नाही. त्यामुळं आता मधुर कोणत्या विषयावर चित्रपट बनवणार या चर्चेला उधाण आलं आहे.
वास्तववादी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला मधुरचा आगामी चित्रपटही वास्तवतेचंच दर्शन घडवणारा असेल असं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. याचसाठी मधुरची नजर सध्या बॅालिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या पत्नींवर स्थिरावली असल्याचं बोललं जात आहे. बॅालिवूडमध्ये आघाडीवर असलेले कलाकार आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून चित्रपटसृष्टीशी निगडीत कार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नींना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवण्याचा विचार मधुरच्या डोक्यात घोळत आहे.
होय, सूत्रांनी दिलेली माहिती खरी ठरली तर मधुरच्या नजरेतून बॅालिवूडमधील अभिनेत्यांच्या पत्नींवरील चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यात शाहरुख खानची पत्नी गौरी खान, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना, शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत यांच्यासह आणखी काही अभिनेत्यांच्या पत्नीवर फोकस करण्यात येणार असल्याचं समजतं. मधुरनं या चित्रपटावर कामही सुरू केल्याचं समजतं, पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
मधुरच्या प्रोडक्शन हाऊसकडून मात्र या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे. सध्या तरी असा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी मधुरच्या वतीनं 'बॉलिवूड वाइव्स' हे टायटल रजिस्टर करण्यात आल्याची गोष्ट मात्र खरी आहे. काही निर्माते-दिग्दर्शक बऱ्याचदा आपल्याला आवडलेलं एखादं टायटल रजिस्टर करून ठेवतात आणि वेळ मिळेल तेव्हा त्यावर चित्रपट बनवतात. त्यामुळं मधुरनं टायटल रजिस्टर केलेला 'बॉलिवूड वाइव्स' हा चित्रपट नेमका कधी बनेल हे सांगणं तसं कठीण आहे.
हेही वाचा -
रस्त्यावरील मुलांना जेव्हा अनुपम खेर भेटतात...
कतरिनानेच मारली बाजी; पुन्हा बनली अक्षयची नायिका