‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर केला आहे. या मालिकेच्या टिमने इतिहासाचा वेध घेत एक अनोखा योगही साधला आहे.
संभाजी महाराजांचं दिलेर खानकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते... काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले... एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. शंभुराजे दिलेर खानकडे श्री क्षेत्र माहुली येथून नदी ओलांडून गेले अशी इतिहासात नोंद आहे. मालिकेच्या टीमने याच ठिकाणी चित्रीकरण करत एक अनोखा योग साधला आहे.
हा योग साधताना ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या संपूर्ण टीमने अक्षरश: तारेवरची कसरत करत जिद्दीने हे चित्रीकरण पूर्ण केलं. चित्रीकरणादरम्यान असलेला मुसळधार पाऊस आणि कृष्णावेण्णेच्या पाण्याला आलेला पूर या सगळ्यावर मात करत संभाजीच्या टीमने चित्रित केलेल्या हा रोमहर्षक भाग रविवारी प्रसारीत होणार आहे.
जिथे इतिहास घडला तिथे चित्रीकरण करण्याचा कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव प्रेक्षकांनाही या भागात घेता येईल. झी मराठी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा रविवारी २२ जुलैला विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. जगदंब क्रिएशन’ची निर्मिती असलेल्या या मालिकेची निर्मिती डॅा. घनश्याम राव, विलास सावंत, अमोल कोल्हे यांनी केली असून, दिग्दर्शन विवेक देशपांडे, कार्तिक केंढे यांचं आहे.
हेही वाचा -
सई झाली भावूक, सेलिब्रेशन ‘दुनियादारी’च्या पाचव्या वर्षपूर्तीचं…