Advertisement

सव्वा लाख झाडं लावणारा अवलिया!


सव्वा लाख झाडं लावणारा अवलिया!
SHARES

मुंबईच्या वरळी हिल परिसरात 1 लाख 24 हजार झाडे सध्या पर्यावरणाची शोभा वाढवत आहेत. मात्र हे सगळं शक्य झालंय प्रगत परिसर व्यवस्थापन(एएलएम)मुळे. तुम्ही म्हणाल त्यात काय? पण इथे 90 च्या दशकात तुम्ही पाहिलं असतं तर तुम्ही पाय देखील ठेवू शकला नसता. त्याचं कारण होतं या परिसरातली अस्वच्छता. 90 च्या दशकात या परिसरातल्या झोपडपट्टीतील मुले इथे उघड्यावर शौचालयाला बसत होती.

त्यामुळे इथे दुर्गंधी तर पसरली होतीच, मात्र इथे आजारानं देखील थैमान घातले होते. मात्र यावर तोडगा काढण्याचा ध्यास घेतला तो याच परिसरात राहणाऱ्या आणि केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या राहमिन जॅकब चरीकर यांनी. चरीकर हे याच परिसरातील मानवमंदिर इमारतीमध्ये राहत होते. एकदा त्यांच्याकडे विदेशी पाहुणे जेवणासाठी आले. मात्र या परिसरातील दुर्गंधी पाहुन त्यांनी हॉटेलमध्ये जाणे पसंत केले. तेव्हापासून चरीकर यांनी या परिसरात स्वच्छतेचा विडा उचलला. आणि सुरू झाली इथली स्वच्छता मोहिमेची लढाई. 

या लढाईसाठी त्यांनी चक्क गांधीगिरीचे हत्यार उपासले. जो कुणी छोटा मुलगा इथे उघड्यावर शौचालयास बसत असे त्याला चरीकर चॉकलेट देत असत. सुरुवातीला लोक त्यांना मूर्ख समजू लागले. मात्र तरी देखील त्यांनी आपली ही गांधीगिरी स्टाईल सोडली नाही. अखेर लोकांना आपली चूक कळून आली तेव्हा हळूहळू इथलं उघड्यावर मुलांना शौचालयास बसवण्याचे प्रमाण देखील कमी झाले आणि हा परिसर स्वच्छ दिसू लागला. आज चरीकर हे 62 वर्षांचे आहेत. त्यांना इथले लोक आता बाबूजी नावानेच ओळखतात. दरम्यान, 1998 मध्ये एएलएम अस्तित्वात आलं तेव्हा त्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शौचालय देखील बनवले.

आता तर त्यांनी लावलेल्या झाडांची संख्या 1 लाख 24 हजारावर गेली आहे. त्यामुळेच आज या परिसरात स्वच्छतेसोबत हिरवळ देखील पहायला मिळते आणि याचं सर्व श्रेय जातं बाबूजींना. या कार्यात बाबूजी यांना साथ देत आहेत शिवराजा रायऐय्य अनुमल्ला उर्फ अण्णा. मागील 18 वर्षांपासून ते बाबूजींसोबत पर्यावरण रक्षणाचे इथं काम पाहत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा