पुढील ६ तासांमध्ये निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईकडे येता-येता निसर्ग चक्रीवादळ ठाणेमार्गे उत्तर महाराष्ट्राकडे सरकलं आहे. वादळाने दिशा बदलली असली तरी मुंबईचा धोका अद्याप (cyclone nisarga live updates imd says cyclone nisarga has started weakening) टळलेला नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
निसर्ग चक्रीवादळाचं मुख्य केंद्र अजूनही अरबी समुद्रात असूनही ते जमिनीवर येण्यासाठी तासाभराचा अवधी लागणार आहे. त्यानंतर 'निसर्ग' चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो. सध्या जरी वाऱ्याचा वेग वाढला असला, तरी पुढील ६ तासानंतर निसर्ग चक्रीवादळाचा जोर कमी होईल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
मुंबई विमानतळावरून असलेल्या हवाई वाहतुकीवर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम झाला असून मुंबई विमानतळावरील वाहतूक सायंकाळी ७ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तर वादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल सेवा खंडित झाली आहे. रायगडमध्ये अजूनही ११० किमी वेगाने वारे वाहत असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
हेही वाचा- निसर्ग चक्रीवादळाची मुंबई, ठाण्याच्या दिशेने कूच- आयएमडी
#निसर्गचक्रीवादळ मुळे निर्माण परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पश्चिम किनारपट्टीच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात; त्यांच्याकडून परिस्थितीची घेत आहेत माहिती.वादळामुळे कमीतकमी नुकसान होईल हे पाहण्याच्या @mybmc आयुक्त इकबालसिंग चहल, प्रभाग अधिकाऱ्यांना सूचना
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 3, 2020
हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्रात येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडणे टाळावं, असं आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
आपत्कालीन यंत्रणा अलर्ट
आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले असून मुंबईतील ६ समुद्र किनाऱ्यांवर ९३ जीवरक्षकांना तैनात करण्यात आलं आहे. तर मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये एनडीआरएफच्या ८ आणि नौदलाच्या ५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कुलाबा, वरळी, वांद्रे, मालाड, बोरीवली या भागात प्रत्येकी १ आणि अंधेरीत ३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
तर, मुंबई महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. आवश्यकता लागल्यास नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून करण्यात येत आहे. माहीम पथ्थरवाडी येथील २५० लोकांना काॅज वे येथील महापालिका शाळेत हलवण्यात आलं आहे. आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिक हेल्पलाईन क्रमांक १९१६ डायल करून त्यानंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा- 'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...